- पार्थ पवार प्रकरणावरून चर्चा रंगली
- भविष्यातील वाटचालही अवघड
पिंपरी – पार्थ पवार हे पवार घराण्यातील तिसरी पिढी, शरद पवार यांचे नातू आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पूत्र म्हणून मोठी पुण्याई पाठीशी आहे. मात्र स्वत:चे कर्तृत्त्व काय? लोकसभा निवडणुकीच्या पराभवानंतर पिंपरी-चिंचवडसाठी आणि त्यापूर्वी त्यांचे योगदान काय? अशी चर्चा सध्या पिंपरी-चिंचवडच्या राजकीय आणि सामाजिक वर्तुळात रंगली आहे. त्यामुळे पार्थ यांची पिंपरी-चिंचवड शहरातील भविष्यातील राजकीय वाटचालही खडतर बनल्याचेच बोलले जात आहे.
राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी त्यांचे नातू पार्थ पवार यांना जाहीररित्या फटकारल्याचे पडसाद गेल्या तीन ते चार दिवसांपासून शहरात उमटत आहेत. यावरून पवार कुटुंबात रंगलेल्या राजकीय नाट्याचीही जोरदार चर्चा सुरू आहे. याबाबत राष्ट्रवादीच्या अथवा विरोधी पक्षाच्या कोणत्याही नेत्याने जाहीर वक्तव्य केले नसले तरी सुप्त चर्चा तरी रंगली आहे. पार्थ पवार यांनी “सुशांतसिंह आत्महत्या’ प्रकरणाची केलेली सीबीआय चौकशी आणि राममंदिर भूमिपूजनाचे केलेले समर्थन यावरून हा कलह निर्माण झाला आहे.
सुरुवातील शरद पवार त्यानंतर अजित पवार आणि सध्या पार्थ पवार हे पिंपरी-चिंचवड शहराच्या राजकीय पटलावर कार्यरत आहेत. लोकसभा निवडणुकीत अचानकपणे मावळ लोकसभेच्या उमेदवारीच्या माध्यमातून राजकीय पटलावर उदय झालेल्या पार्थ पवार यांची शिदोरी ही केवळ “पवार’ हे आडनाव. मात्र याच शिदोरीवर आपण विजयी होणार हा अतिआत्मविश्वास नडल्याने दारुन पराभवाचे तोंड पार्थ यांना पहावे लागले होते. त्यातच त्यांनी प्रचारादरम्यान केलेल्या चुका, स्वत:च्या बेभरवाशाच्या वागण्याने त्यांच्या पराभवाला नकळत त्यांनी स्वत:च हातभार लावला होता.
उमेदवारी जाहीर होण्यापूर्वी पार्थ यांचा तसा मावळ लोकसभा तसेच पिंपरी-चिंचवडला साधा संपर्कही नव्हता. यानंतरही त्यांना साडेपाच लाखांच्या आसपास मते मिळाली होती. एवढी मते मिळाल्यानंतर पराभवानंतर त्यांनी साधा एक दौरादेखील मतदारसंघाचा न केल्यामुळे ते टीकेचे धनी झाले होते. त्यातच पिंपरी-चिंचवड शहरापासूनही ते सहा महिने दूर राहिले होते.
विधानसभा निवडणुकीतही त्यांनी प्रचारात सहभाग नोंदविला नव्हता. त्यामुळे केवळ निवडणुकीपुरता उगवणारा नेता अशी त्यांची प्रतीमा निर्माण झाली होती. आजपर्यंत शहरासाठी अथवा समाजासाठी एकही भरीव काम न करता केवळ चर्चेत राहण्यासाठी पार्थ यांचे प्रयत्न हे सर्वसामान्यांसाठी महत्त्वाचे नसल्यामुळे पार्थ यांना शहरात किती थारा मिळणार, असा प्रश्न निर्माण झाला होता. यानंतर थेट शरद पवारांनीच फटकारल्यामुळे होती तेवढी प्रतिष्ठाही धुळीस मिळाल्याचे बोलले जात आहे.
सर्वसामान्यांसाठी कामाचा अभाव
राजकीय अथवा सामाजिक जीवनात मोठी पदे मिळविण्याचे स्वप्न पहायचे असल्यास कामही तसेच आवश्यक असते. मात्र पार्थ यांना “पवार’ घराण्याच्या शिदोरीवरच मोठे व्हायचे आहे की काय? अशी चर्चा रंगली आहे. लोकसभा निवडणूक, तत्पूर्पी अथवा त्यानंतर शहरासाठी त्यांचे योगदान “शून्य’च ठरले आहे. करोनासारख्या महामारीमध्ये काम करण्याची आणि गरिबांच्या मदतीसाठी धावून जाण्याची त्यांना संधी होती, मात्र ती देखील त्यांनी गमाविली आहे. आश्चर्याची बाब म्हणजे महापालिका आयुक्तांच्या त्यांनी घेतलेल्या “भेटी’देखील शहरातील राष्ट्रवादीच्या नेत्यांना अंधारात ठेवून घेतल्यामुळे पक्षीय पातळीवरही ते बेदखलच ठरल्याचेही सांगण्यात येत आहे.
स्वभावाचाही परिणाम
हट्टी, इतरांची पर्वा न करणारा अथवा मी म्हणेल तीच पूर्व दिशा असा काहीसा पार्थ पवार यांचा स्वभाव असल्याचे सांगण्यात येते. अजित पवारांपेक्षाही एक पाऊल पुढचे असा स्वभाव असल्यामुळे त्याचाही परिणाम त्यांच्या राजकीय आयुष्यावर भविष्यातही होण्याची भीती व्यक्त पार्थ यांचे हितचिंतक वर्तवित आहेत. अजित पवार यांचा शब्द आणि दरारा हा गेल्या 40 वर्षांतील राजकीय जीवनात त्यांनी घेतलेल्या मेहनतीमुळे आला आहे. त्यांचे समाजासाठीचे आणि शहरासाठीचे योगदानही मोठे आहे. त्यामुळे त्यांच्या शब्दाला किंमत आहे. ऐकूण घेतले जात. आता “यांचे’ का ऐकायचे? असाही एक सूर सध्या राष्ट्रवादीत उमटत आहे. त्यातच पक्षबांधणी अथवा कार्यकर्त्यांना ताकद देण्याचा साधा प्रयत्नही पार्थ यांच्याकडून होत नसल्यामुळे केवळ पवारांचा नातू इतकेच त्यांचे कर्तव्य समजले जात आहे.
विरोधकांबाबत भूमिकाही संशयास्पद
पिंपरी-चिंचवड महापालिकेवर राष्ट्रवादीची सत्ता आल्याची स्वप्ने पार्थ यांच्यासह त्यांच्या काही समर्थकांना आतापासूनच पडू लागली आहेत. मात्र गेल्या साडेतीन वर्षांच्या भाजपाच्या कार्यकाळाबाबत अथवा सत्ताधाऱ्यांच्या भ्रष्टाचाराबाबत आतापर्यंत “ब्र’ शब्दही पार्थ यांनी कधीच न काढल्यामुळे या भूमिकेबाबतही सध्या संशय निर्माण होत आहे. त्यातच भाजपाप्रेमी ठरलेल्या आयुक्तांच्या पार्थ यांनी घेतलेल्या छुप्या भेटीदेखील त्यांच्याबाबतचे संशयाचे भूत आणखीनच गडद करण्यास कारणीभूत ठरल्याने त्यांची शहरातील वाटचालही अवघडच असल्याचे सांगण्यात येत आहे.