राजगुरूनगर -जगभरात औद्योगिक हब म्हणून प्रसिद्ध असलेल्या चाकण औद्योगिक वसाहत क्षेत्रातील कंपन्यांमध्ये करोना घुसल्याने कामगारांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. एका खासगी कंपनीत काम करणारे 800 पैकी 120 कामगार पॉझिटिव्ह सापडल्याने तालुक्यासह जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. दरम्यान, ही परिस्थिती समोर येताच जिल्हा व तालुका प्रशासन खडबडून जागे झाले आहे.
एकीकडे तालुक्यातील चाकण, आळंदी, राजगुरूनगर नगरपरिषदेत करोना बाधित व्यक्तींची संख्या मोठी वाढली आहे. तालुक्यातील अनेक गावे बाधित झाली आहेत. तालुक्यात 1 हजार 300 पेक्षा जास्त व्यक्ती बाधित झाल्या आहेत. आतापर्यंत 25 व्यक्तींचा मृत्यू झाला आहे. आता कंपनीत 120 कामगारांचा स्वॅब तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.
खेडच्या ग्रामीण भागात पुणे आणि मुंबई शहरांमधून आलेल्या लोकांमुळे प्रादुर्भाव झाला होता. त्यानंतर तालुक्यातील तीन नगर परिषदा, एमआयडीसीतील काही कंपन्यांमध्ये बाधित सापडले. मागील काही दिवसांपासून सरासरी 50 पेक्षा जास्त व्यक्ती पॉझिटिव्ह येऊ लागल्याने परिस्थिती हाताबाहेर गेली आहे. त्यासाठी काही नियम लागू केले मात्र कंपन्या आणि नागरिकांनी ते न पाळल्याने संसर्ग फैलावला आहे.
चाकण एमआयडीसीमध्ये कामगारांची संख्या मोठी आहे. अनेक कामगार हे पिंपरी चिंचवड, भोसरी आणि पुणे परिसरातून येत असल्याने संक्रमण वाढत आहे. संक्रमित भागात (कंटेनमेंट झोन) मध्ये राहणारे कामगार कंपन्यांमध्ये ये- जा करीत असल्याने संसर्ग फैलावला आहे. 60 ते 70 कामगार तालुक्यातील असण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. चाकण उद्योग नगरीत करोनाचे संकट घोंगावल्याने हे कारखाने चालू ठेवायचे की बंद करायचे, हे मोठे आव्हान कंपनी व्यवस्थापन आणि तालुका प्रशासनापुढे आहे.
चाकण एमआयडीसीमधील णघ कंपनीत काम करणाऱ्या सुमारे 800 पैकी 120 कामगारांचा करोना स्वॅब तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे प्रशासनाची झोप उडाली आहे. चाकण येथील कंपनीत खेडचे सभापती अंकुश राक्षे, गटविकास अधिकारी अजय जोशी, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. बी. बी. गाढवे यांनी कंपनीला भेट दिली, व्यवस्थापनाशी चर्चा केली. कंपनीने नियमांचे पालन केले नसल्याचे प्रथमदर्शनी दिसून येत आले आहे. ही कंपनी तूर्तास बंद ठेवावी, अशा सूचना सभापती राक्षे, जोशी यांनी कंपनी व्यवस्थापनाला दिले आहेत. चौकशी करून या कंपनीवर कारवाई केली जाईल, असे तहसीलदार सुचित्रा आमले यांनी सांगितले.