पहिल्या तिमाहीत थांबली विकासकामे : 556 कोटी 74 लाखांची तरतूद
पिंपरी -“करोना’चा फटका सर्वच क्षेत्रांप्रमाणे प्राधिकरणातील विकासकामांना देखील बसला आहे. आर्थिक वर्ष 2020-21 च्या अर्थसंकल्पात भांडवली विकासकामांसाठी पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणांकडून 556 कोटी 74 लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. त्यापैकी केवळ 4.99 टक्केच रक्कम पहिल्या तिमाहीत प्राधिकरणाला खर्चता आली आहे.
प्राधिकरणाने गेल्या तीन महिन्यांमध्ये विकासकामांवर केवळ 27 कोटी 76 लाख इतकाच खर्च केला आहे. त्यातही सर्वाधिक खर्च पेठ क्रमांक 12 येथील गृहप्रकल्पासाठी 17.34 कोटी इतका करण्यात आला आहे. लॉकडाऊनमुळे कामे बंद असल्याने विकासकामांवर अपेक्षित खर्च होऊ न शकल्याची माहिती प्रशासकीय सूत्रांनी दिली.
पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाचा 2020-21 या आर्थिक वर्षाचा 640 कोटी 88 लाख इतक्या जमा-खर्चाचा अर्थसंकल्प मंजूर आहे. प्राधिकरणाच्या विविध पेठांतील गृहप्रकल्पांसाठी 412 कोटी 10 लाख रुपयांची तरतूद अर्थसंकल्पात केलेली आहे. त्यामध्ये पेठ क्रमांक 12 मधील गृहप्रकल्पासाठी सर्वाधिक 310 कोटींची तरतूद केलेली आहे. तर, वाल्हेकरवाडी येथील गृहप्रकल्पासाठी 60 कोटींची तरतूद आहे. पेठ क्रमांक 12 मधील गृहप्रकल्पासाठी चालू आर्थिक वर्षात एप्रिल ते जून या तीन महिन्यांच्या कालावधीत 17 कोटी 34 लाख इतका खर्च झाला आहे. तर, वाल्हेकरवाडी गृहप्रकल्पासाठी गेल्या तीन महिन्यांमध्ये 1.19 कोटी रुपयांचाच खर्च झाला आहे.
पेठ क्रमांक 12 येथील गृहप्रकल्पात 4 हजार 883 सदनिका उभारल्या जात आहेत. त्यामध्ये आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी 3 हजार 317 तर, अल्प उत्पन्न गटासाठी 1 हजार 566 सदनिकांचे नियोजन आहे. वाल्हेकरवाडी येथील गृहप्रकल्पात 792 सदनिका उभारल्या जात आहेत. मोशी येथील आंतरराष्ट्रीय औद्योगिक प्रदर्शन केंद्रात पहिल्या टप्प्यात होणाऱ्या खुल्या प्रदर्शन केंद्राच्या कामासाठी गेल्या तीन महिन्यांमध्ये 1.38 कोटी इतका खर्च झाला आहे. रस्ते, उड्डाणपूल आदी कामांसाठी 4 कोटी 25 लाख रुपयांचा खर्च करण्यात आला आहे.
लॉकडाऊनचा सर्वाधिक परिणाम
लॉकडाऊनमुळे प्राधिकरणाकडून करण्यात येत असलेली विकासकामे जवळपास दोन महिने बंद होती. त्यानंतर ही कामे सुरू झाली. मात्र, परराज्यातील आणि राज्याच्या अन्य शहरातील कामगार आपापल्या गावी निघून गेल्याने मनुष्यबळाची कमतरता निर्माण झाली आहे. पर्यायाने, सध्या 40 ते 50 टक्के कामगारांवरच कामे सुरू आहेत. 31 तारखेनंतर लॉकडाऊनमध्ये शिथिलता मिळाल्यानंतर काही प्रमाणात कामांना वेग येऊ शकणार आहे. प्राधिकरणाकडे विकासकामांसाठी पुरेशी आर्थिक तरतूद उपलब्ध आहे, अशी माहिती प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी बन्सी गवळी यांनी “दै. प्रभात’ला दिली.