लॉकडाऊनमधून उद्योगांना वगळण्याची मागणी
पिंपरी – अनेक अडचणींशी झुंजून उद्योगांना पुन्हा पूर्वपदावर आणण्यासाठी उद्योजक आणि कामगार झटत आहेत. आधीच आर्थिक कात्रीत सापडलेल्या उद्योगांना पुन्हा ब्रेक लावू नका, अशी मागणी शहरातील उद्योजकांनी केली आहे.
सोमवारी मध्यरात्रीपासून शहरात पुन्हा एकदा दहा दिवसांचा लॉकडाऊन सुरू होणार आहे. उद्योग क्षेत्रात “करोना’चा अधिक प्रादुर्भाव नाही, त्यामुळे उद्योगांना लॉकडाऊनमधून वगळावे, अशी मागणी उद्योजकांकडून करण्यात आली आहे.
शहरात दिवसें-दिवस “करोना’चा उद्रेक वाढतच असल्याने सोमवारपासून दहा दिवसांच्या ‘लॉकडाऊन’ची घोषणा करण्यात आली. लॉकडाऊनची घोषणा होताच उद्योजकांचे धाबे दणादणले आहे. सुमारे दोन महिने उद्योग बंद होते, वारंवार मागण्या करुन उद्योग पुन्हा सुरू करण्यात आले. अवघ्या तीस ते पस्तीस टक्के क्षमतेने उद्योग सुरु आहेत. हळूहळू स्थिती पूर्वपदावर आणण्यासाठी उद्योजक प्रयत्न करत आहेत. उद्योगनगरीत सध्या केवळ 40 टक्के कामगार उरले आहेत. हळूहळू कामगार परतत असतानाच पुन्हा एकदा उद्योग बंद केल्यास कामगार येणार नाहीत आणि भीतीपोटी कामगार परत जातील, अशी भीती व्यक्त करण्यात येत आहे.
लॉकडाऊनमुळे उद्योगांची साखळी आधीच विस्कळीत झाली असून आता कुठे लघु आणि मध्यम उद्योगांना थोडे-थोडे काम मिळण्यास सुरुवात झाली होती. उद्योजकांनी उद्योग पुन्हा सुरू करण्यासाठी मोठ्या प्रमाणात खर्च केला आहे. उद्योग पुन्हा बंद केल्यास तो खर्च पुन्हा करावा लागेल, कामगारांचा पगार व इतर खर्च तसेच सुरू राहतात. आता हा खर्च उद्योजकांना पेलविणारा नाही. उद्योग बंद केल्यास परत येणारे कामगारही थांबतील. उद्योगांबाबत गांभिर्यांने विचार करावा आणि उद्योगांना लॉकडाऊनमधून वगळावे.
– ऍड. आप्पासाहेब शिंदे, अध्यक्ष पिंपरी-चिंचवड चेबर ऑफ इंडस्ट्रीज
सध्या 35 टक्के कामगार कामावर आहेत. उद्योग पुन्हा सुरू करण्यासाठी घालण्यात आलेल्या सर्व अटी, नियमांचे उद्योजक पालन करत आहेत. यासाठी उद्योजकांना मोठा खर्च करावा लागत आहे. पुन्हा उद्योग बंद झाल्यास कामगार परतणार नाहीत. करोना वाढत आहे, हे मान्य आहे. परंतु तो नागरी वस्त्यांमध्ये वाढत आहे. औद्योगिक क्षेत्रात वाढत नाही. आम्ही आमच्या कामगारांची पूर्ण काळजी घेत आहोत. उद्योजकांचे आधीच खूप नुकसान झाले आहे, पुन्हा उद्योग बंद करुन उद्योजकांना अजून अडचणीत आणू नये.
– संदीप बेलसरे, अध्यक्ष, पिंपरी-चिंचवड लघुउद्योग संघटना