पुणे – नवीन उद्योगांच्या स्थापनेसह अस्तित्वातील उद्योगांच्या विस्तारासाठी लागणारे सर्व परवाने कमीत कमी वेळेत द्या, असे आदेश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले आहेत.
उद्योग, सामाजिक न्याय, कामगार, माहिती व जनसंपर्क या चार विभागांचा आढावा उपमुख्यमंत्री पवार यांनी घेतला. त्यावेळी पवार यांनी हे आदेश दिले. यावेळी उपमुख्यमंत्री पवार यांनी सांगितले की, देशाची अर्थव्यवस्था २०२८ पर्यंत ५ ट्रिलियन डॉलर करण्याचा महत्त्वाकांक्षी कार्यक्रम प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आखला आहे.
यामध्ये एक ट्रिलियन डॉलरचे योगदान देण्यासाठी महाराष्ट्राने कृती आराखडा तयार केला आहे. या उद्दिष्टपूर्तीसाठी उद्योग, कामगार विभागाची भूमिका महत्त्वाची राहणार आहे. ग्रामीण भागात उद्योग येण्यासाठी अधिकाधिक सवलत, प्रोत्साहन दिले जावे. उद्योगांना राज्यामार्फत देण्यात येणाऱ्या सोयी-सुविधा, सवलती, प्रोत्साहने याबाबतची माहिती ‘मैत्री’ कक्षाच्या माध्यमातून संबंधितांपर्यंत पोहोचवावी.