30 दिवसांत एकूण रुग्णांच्या 81 टक्के रुग्ण : रिकव्हरी रेट 61 टक्क्यांहून अधिक
नागरिकांनीच सतर्क राहण्याची आवश्यकता
पिंपरी -पिंपरी-चिंचवड शहरात “करोना’ने 3200 रुग्णांचा टप्पा ओलांडला आहे. शहरात “करोना’चा सर्वाधिक उद्रेक जून महिन्यात पहायला मिळाला. जून महिन्याच्या मध्यानंतर रोज सातत्याने शंभरहून अधिक “करोना’चे रुग्ण आढळत आहेत. गेल्या 111 दिवसांपासून शहरात मुक्काम ठेऊन बसलेल्या “करोना’ने 3049 नागरिकांना बाधित केले. त्यापैकी 2483 रुग्णांना जून महिन्याच्या तीस दिवसांत लागण झाली. याचाच अर्थ की गेल्या 111 दिवसांपैकी जून महिन्यांच्या तीस दिवसांमध्ये एकूण रुग्णांपैकी 81 टक्के रुग्णांना “करोना’ची बाधा झाली.
“करोना’ रुग्णांचे बरे होण्याचे प्रमाण समाधानकारक असले तरी रोज जेवढे रुग्ण बरे होऊन घरी परतत आहेत, त्यापेक्षा नव्याने रुग्णालयात दाखल होणाऱ्या रुग्णांची संख्या अधिक आहे. 30 जूनपर्यंत शहरात एकूण रुग्णांच्या तुलनेत बरे झालेल्या रुग्णांचे प्रमाण 61.45 टक्के इतके आहे. असे असले तरी सक्रिय रुग्णांची संख्या रोज उच्चांक स्थापित करत आहे. 30 जून रोजी अकराशेहून अधिक रुग्ण रुग्णांलयामध्ये उपचार घेत होते. ही संख्या महापालिकेच्या दहा रुग्णालंयाच्या क्षमतेजवळ जाऊन पोहचली आहे. रुग्णांची संख्या अशीच वाढत राहिल्यास महापालिकेच्या रुग्णालयांमध्ये बेड मिळणे अवघड होणार आहे.
अपुरी पडणार व्यवस्था
महापालिकेने आपल्या सर्व क्षमतेने उपचार सुरू केले तरी महापालिकेच्या केवळ वायसीएम रुग्णालयातच आयसीयू बेडची सुविधा उपलब्ध आहे. वायसीएम रुग्णालयात 42 आयसीयू बेड आहेत. तसेच 23 चालू स्थितीतील व्हेंटिलेटर आहेत. प्रशासनाने व्यक्त केलेल्या अंदाजानुसार जुलै अखेरपर्यंत शहरात एकूण “करोनाबाधितां’ची संख्या दहा हजाराजवळ जाऊन पोहचेल.
सध्याचा रिकव्हरी रेट पाहता जुलै महिन्याच्या अखेरीस साडे तीन हजाराहून अधिक रुग्ण उपचाराधीन असतील. महापालिकेने खासगी रुग्णालयांमध्ये देखील बेड, अतिदक्षता बेड आणि व्हेंटिलेटर आरक्षित केले आहेत. परंतु जर वेळेत “करोना’ आटोक्यात आली नाही तर शहरातील एकूण व्हेंटीलेटर आणि पालिकेने आरक्षित केलेले खासगी बेडही अपुरे पडण्याची शक्यता आहे.
वैद्यकीय यंत्रणेवर येणार ताण
30 जूनपर्यंत करोनामुळे शहरात 77 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यापैकी 56 रुग्णांचा मृत्यू जून महिन्यात झाला आहे. गेल्या 15 दिवसांपासून करोना रोज रुग्णांचा बळी घेत आहे. याचाच अर्थ की रुग्णांचे प्राण वाचविण्यासाठी आयसीयू बेड आणि व्हेंटिलेटरची आवश्यकता भासणार आहे. गेल्या तीन महिन्यात शहराबाहेरील 306 रुग्ण महापालिकेच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल झाले आहेत शहराबाहेरुन उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांचाही ताण वैद्यकीय यंत्रणेवर आहे. यामुळे परिस्थिती हाताबाहेर जाण्यापूर्वी नागरिकांनीच विशेष सतर्कता घेण्याची मोठी गरज निर्माण झाली आहे.