मुंबई – राज्यात एक जुलैपासून “मिशन बिगीन अगेन”च्या दुसऱ्या टप्प्याला सुरुवात झाली खरी मात्र, मुंबईत वाढत्या रुग्णसंख्येमुळे प्रशासनाने कडक पावले उचलली आहेत. मुंबईत 15 जुलैपर्यंत कलम 144 लागू करण्यात आले आहे. जमावबंदीसह नाईट कर्फ्यू लागू करण्याबाबत आदेश मुंबई पोलीस आयुक्तालयाकडून देण्यात आले आहेत. ही जमावबंदी 1 जुलै मध्यरात्रीपासून 15 जुलै रात्री 12 वाजेपर्यंत लागू असणार आहे. तसेच सकाळी 5 ते रात्री 9 या वेळेत केवळ अत्यावश्यक सेवांमधील कर्मचाऱ्यांनाच बाहेर पडण्यास परवानगी देण्यात आली आहे.
अत्यावश्यक सेवांमधील कर्मचाऱ्यांना या दरम्यान प्रवासाची मुभा असणार आहे. मात्र, त्यांनादेखील फिजिकल डिस्टन्स ठेवणे, कमीतकमी सहा फुटांचे अंतर ठेवणे गरजेचे असल्याचे म्हटले आहे. केवळ अत्यावश्यक काम असेल तरच घराबाहेर पडावे. घराबाहेर फिरताना चेहऱ्यावर मास्क अनिवार्य आहे. सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचे काटेकोरपणे पालन करावे. वरील नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कडक कारवाई केली जाईल.
तसेच यापूर्वीप्रमाणे रात्री 9 ते सकाळी 5 या दरम्यान कर्फ्यू लागू असणार आहे. यादरम्यान अत्यावश्यक सेवांमधील कर्मचाऱ्यांना प्रवासांना सुट असेल. तसेच सर्वसामान्यांना कामासाठी केवळ दोन किलोमीटर अंतरापर्यंत प्रवास करण्याची परवानगी देण्यात आली आहे, अशी माहिती पोलीस उपायुक्त प्रणय अशोक (ऑपरेशन्स) यांनी दिली आहे.
दरम्यान, मुंबईतील करोनाग्रस्तांची संख्या काही दिवसांपासून झपाट्याने वाढत आहे. आतापर्यत मुंबईतील करोनाग्रस्तांचा आकडा 75 हजारांच्या पार गेला आहे. “मिशन बिगिन’ला सुरूवात झाल्यानंतर मर्यादित कामगारांसह अनेक खासगी कार्यालयेही सुरू करण्यात आली आहेत. तसेच सुट दिल्यानंतर अनेक ठिकाणी गर्दीही झाल्याचे पाहायला मिळात आहे. त्यामुळे करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पुन्हा मुंबईत जमावबंदी लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.