नवी दिल्ली : भारत आणि चीन यांच्यातील परिस्थिती पूर्णपणे चिघळण्याच्या मार्गावर आहे.त्यात चीनकडून सीमेवर सैन्याची जमवाजमव करण्यात येत असल्याची माहिती समोर येत आहे. याच पार्श्वभूमीवर भारतीय सैन्य युद्धजन्य परिस्थितीचा सामना करण्यासाठी सज्ज असल्याची माहिती लष्करप्रमुख जनरल एम.एम.नरवणे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दिली.
लष्करप्रमुख जनरल एम.एम.नरवणे यांनी लडाखमधील परिस्थितीची आणि भारतीय सैन्याच्या तयारीची पंतप्रधानांना माहिती दिली. युद्धजन्य परिस्थितीचा सामना करण्यासाठी भारतीय सैन्य पूर्णपणे सज्ज असून चीनने कुठलीही आगळीक केल्यास चोख प्रत्युत्तर देण्यासाठी भारतीय सैन्य पूर्णपणे तयार असल्याचेही त्यांनी यावेळी म्हटले.
पूर्व लडाखमधील नियंत्रण रेषेजवळील भागांना भेट देऊन आल्यानंतर लष्करप्रमुख नरवणे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेऊन त्यांना परिस्थितीची कल्पना दिली. त्यानंतर काल शुक्रवारी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांची भेट घेतली. एका इंग्रजी वर्तमानपत्राने याविषयी माहिती दिली आहे.
भारताने आपल्या तयारीमध्ये कुठलीही कमतरता ठेवलेली नाही. बोफोर्स, हॉवित्झर तोफा, टी-९०, टी-७२ रणगाडे तैनात केले आहेत. इंडियन एअर फोर्सचे सुखोई-३० एमकेआय आणि मिग-२९ या फायटर विमानांची आकाशात नियमित गस्त सुरु आहे. सैन्य तुकडयांबरोबरच घातक शस्त्रास्त्र तयार आहेत. त्याशिवाय चिनूक, अपाची हेलिकॉप्टरच्या फेऱ्याही सुरु आहेत.
चीन एकाबाजूला चर्चा करतोय पण दुसऱ्या बाजूला सैनिकांची संख्या सुद्धा वाढवत आहे. या दुटप्पी भूमिकेमुळे कोंडी निर्माण झाली आहे. प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर तणाव असल्याने पुन्हा गलवान सारखा संघर्ष होण्याची शक्यता नाकारता येत नाही. पँगाँग आणि गलवान खोऱ्यात हा तणाव जास्त आहे. त्यामुळे इथे शीतयुद्धाची परिस्थिती निर्माण झाली आहे.