पकडून दिल्याचा राग; संशयिताच्या पत्राने खळबळ
सातारा (प्रतिनिधी) : पुळकोटी ता.माण येथील महिला पोलीस पाटील यांना कळंबा कारागृह कोल्हापूर येथून थेट धमकी वजा सावध करणारे पत्र आल्याने माण तालुक्यात मोठी खळबळ उडाली आहे. पुळकोटी येथील एकाकडून पोलिसांना पकडून दिल्याच्या रागातून खून केला जाणार असल्याचे जांभुळणी ता.माण येथील व सध्या कळंबा कारागृहात असलेल्या संशयिताने पत्राद्वारे महिला पोलीस पाटील यांना कळवले आहे. या सगळ्या प्रकारामुळे माण तालुक्यातील पोलीस पाटील भितीच्या सावटाखाली दिसून येत आहेत.
याबाबत अधिक माहिती अशी की, पुळकोटी येथील कालीदास पोपट शिंदे याच्यावर पत्नीसोबत वाद झाल्यानंतर खूनाच्या प्रयत्नाचा गुन्हा म्हसवड पोलीस ठाण्यात दाखल झाला होता. पोलिसांनी त्याला अटक करून न्यायालयात हजर केल्यानंतर त्याची रवानगी कळंबा कारागृहात करण्यात आली होती. त्याठिकाणी एका गुन्ह्यात अगोदरपासून असलेल्या जांभुळणी येथील मुलेश काळेल सोबत शिंदे याची ओळख झाली. त्यानंतर त्या दोघांच्यात संवाद झाला व त्या दरम्यान शिंदे याने पुळकोटीच्या पोलीस पाटील यांच्यामुळेच मी पोलिसांना सापडल्याचे सांगून कारागृहातून बाहेर गेल्यावर पोलिस पाटील असलेल्या महिलेला जिवंत सोडणार नसल्याचे काळेल याला सांगितले. त्यानंतर शिंदे हा जामीनावर बाहेर आला आहे. शिंदे बाहेर आल्यानंतर काळेल याने पोलीस पाटील महिलेला पत्र पाठवून शिंदे हा तूला मारून टाकणार आहे त्यामुळे काळजी घे, असे सांगत कारागृहात आम्हाला गुन्हेगारी काय असते याची माहिती मिळाल्याचे म्हटले आहे. तसेच तू काळजी घेतली नाहीस तर तुझ्या जिवाला शिंदे याच्याकडून धोका होईल असे पत्रात नमुद केले आहे.
सदर पत्र हे कळंबा कारागृहातून दि. 19 जून रोजी मंडल तुरूंगाधिकारी यांच्या सहीने बाहेर पडल्याचे त्याच्यावर असलेल्या सही व शिक्क्यावरून स्पष्ट होत आहे. याप्रकरणी संबंधित पोलीस पाटील यांनी म्हसवड पोलीस ठाण्यात धाव घेतली असता पोलिसांनी कालीदास शिंदे याला पोलीस ठाण्यात बोलवून समज दिली आहे. मात्र, याप्रकरणी कालीदास व मुलेश या दोघांच्यावर गुन्हा दाखल करावा अशी मागणी पीडित पोलीस पाटील यांनी प्रभात’जवळ व्यक्त केली.