श्रीक्षेत्र आळंदी – “हे विश्वचि माझे घर” अशी विश्वव्यापक दृष्टी असणाऱ्या माऊली ज्ञानोबारायांनी “श्री ज्ञानेश्वरी’रूपी अनमोल ग्रंथाची निर्मिती करून सकल मानवजातीवर अनंत उपकार केले आहेत. ज्ञानेश्वरी म्हणजे समाधानी जीवनाचा राजमार्ग आहे, असे मत हभप लक्ष्मण महाराज शास्त्री यांनी व्यक्त केले. “राजविद्या राजगुह्ययोग’ अध्यायावर निरूपण केले.
हभप शास्त्री म्हणाले, ज्ञानेश्वरी म्हणजे अगदी सहज सोप्या भाषेत, दृष्टांतपूर्वक गीताशास्त्रावर माऊलींनी चढवलेला अलंकार होय. ज्याच्यापुढे वेदांचे शब्दही कुंठीत झाले, तो गीतार्थ माउलींनी समर्थपणे मराठीत सांगितला आहे. गीतेचे अठरा अध्यायांमध्ये 9 व्या अध्यायाचे विशेष महत्त्व आहे. सर्व विद्यांचा राजा असलेले अद्वैत ज्ञान भगवंताने अर्जुनाला या अध्यायात सांगितलेले आहे. म्हणूनच या अध्यायाला राजविद्याराजगुह्ययोग असे म्हणतात. भगवंताच्या अंतःकरणातील अतिगुह्य असे ज्ञान त्यांनी अर्जुनाला सांगितले आहे आणि अर्जुनाच्या निमित्ताने ते ज्ञान आपल्यापर्यंत पोहोचविले आहे. हे ज्ञान समजून घेण्यासाठी चित्ताची एकाग्रता अत्यंत आवश्यक असल्याने माऊली प्रारंभीच म्हणतात,
तरी अवधान एकले दीजे ।
मग सर्व सुखांसी पात्र होईजे।
कार्यक्रामाचे निवेदन हभप स्वामीराज भिसे यांनी केले. दरम्यान, श्रीक्षेत्र आळंदी येथे आजोळघरी श्री ज्ञानेश्वर माउलींच्या पादुकांची विधिवत पूजा, अभिषेक व आरती पालखी सोहळा प्रमुख योगेश महाराज देसाई यांच्या हस्ते करण्यात आली. यज्ञेश्वर जोशी व राहूल जोशी यांनी पूजेचे पौरोहित्य केले. सोपानकाका कराडकर यांच्या वतीने जागराची सेवा करण्यात आली.