नवी दिल्ली : लष्कर प्रमुख मनोज मुकूंद नरवणे हे परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी लडाखमध्ये दाखल झाले आहेत. त्याचवेळी लडाखमध्ये निर्माण झालेला तणाव कमी करण्यासाठी लष्कर मागे घेण्यास चीनने संमती दर्शवली. दोन्ही बाजूचे लष्कर मागे घेण्यात येईल. त्याबाबत तपशील नंतर ठरवण्यात येईल, असे चीनने स्पष्ट केले. भारत आणि चीनमध्ये लष्करी अधिकाऱ्यांमध्ये चर्चेच्या दुसऱ्या फेरीत हा निर्णय घेण्यात आला.
लेफ्टनंट जनरल हरिंदर सिंग यांच्या नेतृत्वाखालील भारतीय पथकाने चीनी लष्करी अधिकाऱ्यांशी सुमारे 11 तास चर्चा केली. चीनच्या शिष्टमंडळाचे नेतृत्व तिबेट मिलिटरी डिस्ट्रीक्टचे मेजर जनरल लिऊ लिन करत आहेत.
दोन्ही देशांमधील जवानांमध्ये दि. 15 च्या मध्यरात्री जोरदार धुमशान उडाली होती. त्यात भारतीय लष्कराचे 20 जवान शहीद झाले होते. याबाबत भारताने चीनने कट रचून केलेली नियोजनबध्द कृती असे त्याचे वर्णन केले होते.
दरम्यान, आज झालेल्या चर्चेत दोन्ही लष्करांमध्ये सीमांवरून जवानांची संख्या कमी करण्याबाबत एकमत झाले. पूर्व लडाखच्या सर्वच भागातून आपापले लष्कर मागे घेण्याच्या कार्यवाहीबाबत दोन्ही देशांत सकारात्मक चर्चा झाली. ती यापुढेही सुरू ठेवण्याचा निर्णय झाला असल्याचे सूत्रांनी सांगितले.
या बैठकीत गलवान खोऱ्यात चीनी सैन्याकडून भारतीय जवानांवर झालेल्या हल्ल्याचा मुद्दा ठामपणे मांडण्यात आला. गलवान खोऱ्यासह पूर्व लडाखमधील सर्व सैन्य तातडीने मागे घेण्याची मागणी करण्यात आली.