दिघीतील संतोष वाळके यांची आळंदी देवस्थानाकडे विनंती
चऱ्होली – करोना विषाणूच्या संसर्गामुळे या वर्षी संत ज्ञानेश्वर महाराज यांचा आषाढी वारी पायी पालखी सोहळा खंडित झाला असला तरी राज्य सरकारने माउलींच्या पादुका हेलिकॉप्टर अथवा बसच्या माध्यमातून पंढरपूरला आषाढी वारीसाठी नेणार असल्याचे जाहीर केले होते. यासाठी होणारा संपूर्ण खर्च उचलण्याची जबाबदारी आम्हाला मिळावी अशी दिघीतील शिवसेना प्रमुख संतोष तानाजी वाळके यांनी निवेदनाद्वारे देवस्थानाकडे विनंती केली आहे.
आळंदी देवस्थानचे प्रमुख विश्वस्त ऍड. विकास ढगे यांना या वेळी निवेदन दिले. निवेदनामध्ये म्हटले की, आमच्या घरात पंढरीच्या वारीची आणि अन्नदान करण्याची परंपरा आहे. यंदा मात्र करोनामुळे दरवर्षीप्रमाणे भव्य पायी पालखी सोहळा नसणार आहे. त्यामुळे यंदाच्या वर्षी कोणत्याच प्रकारची सेवा आमच्या कुटुंबाकडून होणार नाही. ही खंत राहू नये, यासाठी माउलींच्या पादुका हेलिकॉप्टर अथवा बसद्वारे राज्य सरकारकडून पंढरपुरात नेल्या जाणार आहेत. तेव्हा माउलींचा सेवक म्हणून हा खर्च उचलण्याची जबाबदारी आपल्याला मिळावी, अशी विनंती वाळके यांनी या निवेदनाद्वारे केली आहे.