मुंबई- अभिनेता सुशांत सिंह राजपूत याच्या आत्महत्येनंतर चित्रपटसृष्टीतील वातावरण तापले असून येथील घराणेशाही आणि कंपूशाहीविरूध्द बातम्यांनी सोशल मीडिया ढवळून निघाला आहे. तर दुसरीकडे बॉलीवूड स्टार किड्स सोशल मीडियाद्वारे आपल्या चित्रपटात संधी मिळण्याचा अनुभव शेअर करत आपली बाजू मांडत आहे.
यातच कलाविश्वात अमिताभ बच्चन या नावाचा दबदबा असल्याचं पाहायला मिळतं. त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवत अभिषेक बच्चनने कलाविश्वात पदार्पण केलं. याच पदार्पणबाबतचा अनुभव अभिषेकने इंस्टाग्रामवर शेअर केला आहे.
अभिषेकने इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली असून या पोस्टमध्ये त्याच्या करिअरच्या सुरुवातीचा संघर्ष सांगितला आहे. “२००० मध्ये जे.पी.दत्ता यांच्या ‘रेफ्युजी’ या चित्रपटातून मी कलाविश्वात पदार्पण केलं होतं. मात्र यापूर्वी १९९८ साली राकेश ओमप्रकाश मेहरा ‘समझौता एक्स्प्रेस’ हा चित्रपट तयार करणार होता. या चित्रपटात मला काम करण्याची संधी मिळणार होती. मात्र अथक प्रयत्न केल्यानंतरही मला कोणीच लाँच करायला तयार नव्हतं. मला चांगलं आठवतंय मला काम मिळावं म्हणून मी कित्येक दिग्दर्शक, निर्माते यांच्या भेटी घेतल्या. मला काम करण्याची संधी द्या यासाठी विनंतीही केली. मात्र त्यावेळी कोणीच तयार नव्हतं. त्यामुळे मी आणि राकेशने स्वत: काही तरी करायचा निर्णय घेतला. यात राकेश ‘समझौता एक्स्प्रेस’चं दिग्दर्शन करेल आणि मी अभिनेता म्हणून काम करेन असं ठरलं होतं. मात्र तो चित्रपट अर्ध्यावरच रखडला”.