भाजपच्या स्थितीत झाली सुधारणा
नवी दिल्ली – देशात काल झालेल्या राज्यसभा निवडणुकीनंतर या सभागृहातील समिकरणे आता बदलली असून तेथे भाजप आता समाधानकारक स्थितीत आला आहे. कालच्या निकालानंतर 245 सदस्यांच्या सभागृहात भाजपचे संख्याबळ 86 झाले असून कॉंग्रेसचे संख्याबळ 41 वर आले आहे. या सभागृहात आता भाजपप्रणित एनडीएकडे 100 इतके संख्याबळ झाले आहे. अद्रमुक, बीजेडी, वायएसआर कॉंग्रेस, आणि अन्य छोट्या पक्षांचे संख्याबळ लक्षात घेतले तर भाजपला आता राज्यसभेत संख्याबळाची फारशी चिंता बाळगण्याची स्थिती राहिलेली नाही.
देशात अलिकडेच 61 राज्यसभा सदस्यांची निवडणूक झाली. त्यापैकी 42 जण आधीच बिनविरोध निवडून आले होते. उर्वरीत 19 जागांसाठी काल निवडणूक झाली. त्यातील आठ जागा भाजपने जिंकल्या, कॉंग्रेस व वायएसआर कॉंग्रेसने प्रत्येकी चार जागा जिंकल्या तर अन्य पक्षांना तीन जागा मिळाल्या. मध्यप्रदेश आणि गुजरात मध्ये, भाजपला कॉंग्रेस आमदारांच्या फाटाफुटीमुळे दोन जागा जास्त मिळाल्या आहेत. एकूण 61 जागांपैकी भाजपने 17, कॉंग्रेसने नऊ, जेडीयुने तीन, बीजेडी आणि तृणमूल कॉंग्रेसने प्रत्येकी चार, अद्रमुक, डीएमकेने प्रत्येकी तीन, राष्ट्रवादी कॉंग्रेस, राजद आणि टीआरएस यांनी प्रत्येकी दोन जागा मिळवल्या.