मुंबई – चीनने लडाखमधील गलवान खोरे आपल्या मालकीचे असल्याचा दावा केला आहे. त्यावर केंद्र सरकारने त्वरित खुलासा केला पाहिजे, अशी मागणी शिवसेनेतर्फे करण्यात आली आहे. शिवसेनेच्या उपनेत्या प्रियांका चतुर्वेदी यांनी ही मागणी केली आहे. पूर्व लडाखमधील गलवान खोरे हे प्रत्यक्ष ताबारेषेच्या अलीकडे येत असल्याने त्यावर आमचाच हक्क आहे, असा दावा चीनच्या विदेश मंत्रालयाने शुक्रवारी केला आहे.
त्याच पार्श्वभूमीवर चीनने भारतीय हद्दीत अतिक्रमण केलेच नाही, असा दावा पंतप्रधान मोदींनी केला आहे. त्यावर प्रतिक्रिया देताना प्रियांका चतुर्वेदी यांनी म्हटले आहे की, भारताच्या भूमीवर चीनने कोठेही अतिक्रमण केलेले नाही आणि त्या पाठोपाठ चीन असा दावा करते आहे की गलवान खोरे आमचेच आहे. त्यावर सरकारने प्रतिसाद देऊन विस्तृत खुलासा केला पाहिजे. चीनचा हा दावा आम्हाला मान्य नाही. गलवान खोऱ्यावरील दावा भारताने सोडला आहे काय, याचा खुलासा देशाला हवा आहे. प्रियांका चतुर्वेदी या शिवसेनेच्या राज्यसभा सदस्य आहेत.