अगोदरच देशभरात करोनाचे थैमान; मान्सूनचे लवकरच आगमन
आरोग्य यंत्रणांवर ताणही वाढणार; शहरे पुन्हा तुंबणार का?
मुंबई – मान्सून अथवा पावसाळा हा नेहमीच चांगला असतो. शेतीसाठी आणि पिण्याच्या पाण्यासाठी तो आवश्यकच. त्यामुळे दरवर्षी कधी उन्हाळा संपतो आणि मान्सूनचे आगमन होते, याची वाट पाहिली जाते. मान्सूनच्या वाटचालीत थोडा जरी अडथळा निर्माण झाला तरी काळजाचा ठोका चुकतो. मात्र, यंदा वेगळी स्थिती आहे. मान्सूनच्या आगमनाच्या उत्साहापेक्षा त्याची भीतीच अधिक गडद होताना दिसते आहे. त्याला कारण करोनाने देशभरात घातलेले थैमान. या एका संकटाशीच दोन हात करण्यात अख्खी सरकारी यंत्रणा गुंतलेली असताना पाऊस गेल्या वर्षासारखा अंदाधुंद बरसला तर काय होईल, या भीतीने आताच काळजी वाढवली आहे.
देशात लॉकडाऊन असतानाही करोनाचे रुग्ण सापडत आहेत. लॉकडाऊन शिथिल केल्यानंतर तर रुग्णांच्या संख्येत गुणाकाराच्या पटीत वाढ होते आहे. संपूर्ण देशाने दीड लाखांचा तर एकट्या महाराष्ट्राने पन्नास हजारांचा आकडा ओलांडला आहे. रुग्णांची संख्या वाढत असताना त्यांच्यावर उपचार करण्यासाठी बेड शिल्लक नसल्याच्या बातम्या येत आहेत. करोनाची लक्षणे असणाऱ्या रुग्णांना हॉस्पिटलच्या चकरा माराव्या लागत आहेत. मात्र, दाखल करणे तर सोडाच साधी तपासणीही त्यांच्या नशिबी नसल्याची स्थिती मुंबईत असल्याचे वृत्त आहे. अशा स्थितीत करोनाच्या दहशतीमुळे मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयरोग, कर्करोग, यकृत अशा अन्य आजारांच्या रुग्णांचे काय होत असेल याचा विचार न केलेलाच बरा. रुग्ण हा एकटा असतो. त्यामुळे सगळ्यांच्याच व्यथा आणि वेदना माध्यमांपर्यंत येत नाहीत. मात्र, आजची मुंबईतली असो किंवा अन्य ठिकाणची आरोग्य यंत्रणा आणि तिच्या मर्यादा करोनाचा सामना करता करताच बेजार झाल्याचे स्पष्ट दिसते आहे. त्यात पावसाचे आगमन झाल्यावर नागरिकांच्या हलाखीत भरच पडणार आहे.
पावसाळ्या सोबत सामान्यत: काही दुखणी डोके वर काढतात. सर्दी, खोकला आणि किंचितसा ताप येणाऱ्यांची संख्या लक्षणीय असते. करोनाचीही हीच लक्षणे सांगितली गेली आहेत. आजच रुग्णांना अशा समस्या असल्या की हात लावायला डॉक्टर धजावत नाहीत. खासगी डॉक्टरांनी तर जशी काही सुटीच घेतली आहे व या प्रक्रियेपासून स्वत:ला अलिप्त ठेवले आहे. असे असताना पावसाळी आजारांनी येत्या पंधरवड्यानंतर काय चित्र निर्माण होईल याचा सरकारला गांभीर्याने विचार करावाच लागणार आहे. नुसता विचारच नाही, तर काटेकोर नियोजनही करावे लागणार आहे.
राज्य काय करणार?
गेल्या पावसाळ्यात पावसाची कृपा झाली आणि नंतर अवकृपाही. सांगली, कोल्हापूर, मुंबई, पुणे, ठाणे, नाशिक अशा बहुतेक ठिकाणी आभाळ फाटल्यासारखा पाऊस कोसळला. रस्त्यांवर नद्या वाहत होत्या. दोन दोन दिवस जनजीवन ठप्प झाले होते. मुंबई आणि पुण्यात तर सिमेंटचे जंगल उभे राहिले आहे. पावसाळ्यात मिठी नदीच्या पुराची मिठी मुंबईला आता नवीन राहिली नाही. देशाची ही आर्थिक राजधानी अक्षरश: तुंबलेली असते. गेल्या वर्षी असाच फटका पुण्यालाही बसला. आता या सगळ्या गोष्टी उगाळायचे कारण मान्सून दाखल होणार आहे. त्यानंतर त्याचा प्रवास राज्यांकडे होईल. अशा वेळी करोनात गुंतलेली आणि आर्थिकदृष्ट्या डबघाईला आलेली राज्य सरकारे काय करतील, काही करतील की नाही, त्यांची तयारी झाली आहे का, असे अनेक प्रश्न आहेत.