कराड -सवंग लोकप्रियता मिळवण्यासाठी करोनामुक्त महिलेचे शहरातील काही स्वंयघोषीत पुढाऱ्यांनी चुकीच्या पद्धतीने स्वागत केले आहे. त्यांनी केलेल्या चुकीच्या पद्धतीच्या स्वागतामुळे स्वतःचा स्वार्थ व आयता मोठेपणा मिळवण्यासाठी नियमबाह्य स्वागत करण्याचा चुकीचा प्रकार केला आहे, अशी टिका पालिकेचे उपाध्यक्ष जयवंत पाटील यांनी आज केली.
येथील मंगळवार पेठेतील महिलेचे तिच्या घराजवळ आल्यानंतर पृष्पवृष्टी करत त्या महिलेस पुष्पगुच्छ देवून काही नागरीकांनी व राजकीय पदाधिकाऱ्यांनी स्वागत केले. त्या स्वागतावर आक्षेप घेत उपाध्यक्ष यांनी त्यांच्यावर टिका केली. त्याबाबतचे पत्रक पाटील यांनी प्रसिद्धीस दिले आहे. पत्रकात म्हटले आहे की, कॉटेज हॉस्पिटलमधील निष्काळजी पणामुळे कराड शहरात करोनाचा शिरकाव झाला. त्यात मंगळवार पेठेतील ज्येष्ठ महिला करोनाबाधित झाली. त्या महिलेला दवाखान्यात नेण्यासाठी रूग्णवाहिका उपलब्ध झाली नाही. शेजारी राहणाऱ्यांनी शेजारधर्म पाळला नाही. त्या महिलेच्या घरातील लोक क्वारंटाईन होते. त्यांची सर्व सोय रणजीत पाटील, जयवंत पाटील यांनी करत माणुसकीचे दर्शन दिले.
या सगळ्या कालावधीत संपूर्ण परिसरातील नागरीक मानसिक तणावाखाली व भितीच्या छायेत होते. अशावेळी स्वयंघोषीत पुढाऱ्यांनी कोणतीही सहानुभूती दाखवली नाही. उलट त्या सगळ्यास छेद देणारी घटना घडली. करोनामुक्त महिलेचे चुकीच्या पद्धतीने सामाजिक म्हणवून घेणाऱ्यांनी स्वागत केले. त्याचे व्हिडीओ करून समाज माध्यमात व्हायरल केले. करोनाच्या रूग्णांची माहिती व्हायरल करणे नियमबाह्य असतानाही त्यांनी ते केले. त्यामागे त्यांची सवंग लोकप्रियता मिळवण्याचीच भावना असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.