कोल्हापूर/प्रतिनिधी : कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावाने उत्पन्नाचे स्त्रोत कमी झाल्याचे सांगून राज्य सरकारने महात्मा फुले कर्जमाफी योजना स्थगित केली. तर संबंधित शेतकर्यांची कर्जाची शासनाकडून येणे दर्शवावी, असा आदेश काढला आहे.
मात्र मुळात जिल्हा बँकांकडे पैसे नाहीत. आरबीआयचे न ऐकणार्या बँका राज्य सरकारचे ऐकून शेतकर्यांना खरीपासाठी कर्ज देतील का? असा सवाल स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी उपस्थित केला आहे.
गेल्या वर्षी राज्य सरकारने महात्मा जोतीराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना 2019 जाहीर करून 2 लाख रूपये थकीत असलेल्या शेतकर्यांचे कर्ज माफ केले असल्याचे जाहीर केले. 19 लाख शेतकर्यांना लाभ मिळाला असल्याचे सरकारने जाहीर केले आहे.
मात्र अद्यापही 11 लाख शेतकरी या योजनेपासून वंचित आहेत. या शेतकर्यांचे कर्ज भरले गेले नाही तर शेतकर्यांना जून महिन्यात कर्ज मिळणार नाही. त्यामुळे खरीप हंगामाच्या तोंडावर शेतकर्यांना अडचणीत आणले जाणार आहे.