मुंबई – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज फेसबुक लाइव्हद्वारे जनतेशी संवाद साधताना महाराष्ट्रामध्ये कोरोना विषाणूची साखळी तोडण्यास अद्याप यश आलेले नाही अशी स्पष्टोक्ती केली. देशव्यापी लॉक डाऊनचा तिसरा टप्पा संपण्यास केवळ ९ दिवस उरलेले असताना देखील महाराष्ट्रातील कोरोना बाधितांचा आकडा झपाट्याने वाढत असल्याने मुख्यमंत्री नक्की काय घोषणा करतात याकडे सर्वांचेच लक्ष लागले होते.
मुख्यमंत्र्यांच्या संबोधनातील महत्वाचे मुद्दे
लॉक डाऊन वाढणार?
मुख्यमंत्र्यांनी आज जनतेशी बोलताना, ‘राज्यातील लॉक डाऊनमुळे कोरोनाची गती रोखण्यास यश आले असले तरी कोरोनाची साखळी तोडण्यात अद्याप यश आले नाही. येणाऱ्या दिवसांमध्ये आपल्याला अधिक काळजी घेणे गरजेचे आहे.’ असे स्पष्ट केले. मुख्यमंत्र्यांचे हे वक्तव्य राज्यातील लॉक डाऊन वाढणार असल्याचा संकेत मानण्यास वाव आहे.
मुंबईमध्ये लष्कर नाही; मात्र…
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यावेळी बोलताना मुंबईमध्ये लष्कर बोलावण्यात येणार असल्याच्या चर्चांना पूर्णविराम दिला. मुंबईमध्ये लष्कर बोलावणार नाही असे त्यांनी स्पष्ट केले. मात्र राज्यातील पोलीस कर्मचारी कोरोना ड्युटीमुळे कंटाळले असून गरज पडल्यास त्यांना विश्रांती देण्यासाठी केंद्राकडून (केंद्रीय सुरक्षा दलाची) मदत घेऊ असे देखील त्यांनी स्पष्ट केले.
परप्रांतीय मजुरांनी संयम राखावा
मध्यप्रदेशातील मजुरांना रेल्वे मालगाडीने चिरडल्याबाबत दुःख व्यक्त करताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी परप्रांतीय मजुरांना संयम राखण्याचे आवाहन केले. महाराष्ट्र सरकारची केंद्र व विविध राज्य सरकारांसोबत चर्चा सुरु असून लवकरात लवकर आपणास घरी सोडण्याची व्यवस्था केली जाईल असं देखील त्यांनी सांगितलं.
महाराष्ट्रात कोरोनाच्या सर्वाधिक चाचण्या
महाराष्ट्रामध्ये कोरोना विषाणूची बाधा झालेले सर्वाधिक रुग्ण आहेत. मात्र महाराष्ट्रामध्ये चाचण्यांची संख्या सर्वाधिक असल्याने आपण अधिकाधिक कोरोनाबाधितांपर्यंत पोहचून त्यांना योग्य उपचार देत आहोत. असं त्यांनी स्पष्ट केलं.
पोलीस व आरोग्य कर्मचाऱ्यांवरील हल्ले खपवून घेणार नाही
राज्यातील कोरोना विषाणूविरोधातील युद्धाचे नेतृत्व करणाऱ्या डॉक्टर्स, आरोग्य कर्मचारी व पोलिसांवरील हल्ले खपवून घेणार नाही असे सांगत मुख्यमंत्र्यांनी कोरोनाचा सामना करणाऱ्या या योद्धयांसोबत गैरवर्तणूक करू नका अन्यथा कडक करण्यात येईल अशी तंबी दिली.