आमदार बेनके : उर्वरित पाणी आवर्तनास देण्यासाठी हरकत नाही
नारायणगाव (वार्ताहर) – जुन्नर तालुक्यातील चार धरणांमध्ये पुरेसा पाणीसाठा असून तालुक्याला पिण्याचे आणि शेतीसाठी हा पाणीसाठा मुबलक आहे, अशी माहिती जुन्नरचे आमदार अतुल बेनके यांनी दिली.
कालवा सल्लगार समितीची बैठक व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे झाली. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी जलसंपदामंत्री जयंत पाटील होते. या बैठकीत आमदार बेनके यांनी तालुक्याला मुबलक पाणीसाठा ठेऊनच उर्वरित पाणी आवर्तनासाठी देण्यास हरकत नाही, अशी भूमिका मांडली. आमदार अतुल बेनके यांनी दिलेल्या माहितीनुसार जुन्नर तालुक्यातील पिंपळगाव जोगा धरणामधील अचल पाणी(मृत) साठ्याला हात लावु न देणे यामध्ये बैठकीत यश प्राप्त केले आहे. पिंपळगाव जोगा कालव्याचे आवर्तन 2 मे 2020 पासून 27 मे 2020 पर्यंत ठरल्याप्रमाणे होणार आहे.
वडज धरणामध्ये 0.350 टीएमसी पाणीसाठा शिल्लक असून हा साठा मीना शाखा व मीना नदी वरील कोल्हापुरी पद्धतीचे बंधारे भरुन देण्यासाठी पुरेसासाठा आहे. त्याचे आवर्तन 10 मे पासून ते 20 मे 2020 पर्यंत सुरू रहाणार आहे. डिंभे धरणातून येडगाव धरणामध्ये सातत्याने विसर्ग सुरू आहे, त्यामध्ये 10 मे 2020 पर्यंत येडगाव धरणामध्ये पुरेसा साठा उपलब्ध होईल. डिंभे धरणातून घोड शाखा व मीना शाखा यांचे आवर्तन 10 मे 2020 पासून सुरू होणार आहे. जुन्नर तालुक्यातील सर्व कोल्हापुरी पद्धतीचे बंधारे पूर्ण क्षमतेने भरण्यात आले आहेत, अशी माहिती आमदार बेनके यांनी दिली.
माणिकडोहमध्ये पाचपट साठा
सध्या माणिकडोह धरणामध्ये 0. 970 टीएमसी इतका पाणीसाठा उपलब्ध आहे. 2018-19 पेक्षा 19-20 मध्ये पाचपटसाठा माणिकडोह धरणामध्ये शिल्लक आहे. या साठ्याचा लाभ पिंपळगाव सिद्धनाथ, जुन्नर शहर, आगर अमरापूर, हापूसबाग, गोळेगाव, कुमशेत, शिरोली बुद्रुक व शिरोली खुर्द या गावांना होऊन हा साठा जून अखेरपर्यंत पुरेल.