रामचंद्र सोनवणे
राजगुरूनगर – करोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर जगाचा पोशिंदा असणाऱ्या शेतकरी राजाची परिस्थिती चिंताजनक झाली आहे. शेतावर काम करायला मंजूर येत नाहीत तर जवळपासच्या सर्व बाजारपेठा बंद आहेत, यामुळे लाखोंच नुकसान झाले आहे. एकंदरीत कष्ट करून कमावलेल्या पिकाची माती होताना शेतकऱ्याला उघड्या डोळ्यांनी बघावे लागत आहे. जरी शेती व्यवसायशी निगडीत सर्व व्यवसाय सुरू करण्याची मुभा असली तरी करोनाच्या भीतीमुळे अनेक जण व्यवसाय सुरू करीत नाहीत तर आपल्याही करोना होईल या भीतीने मजूरही शेतात जाईना यामुळे शेतातील कामेही हव्या त्या प्रमाणात होत नसल्याने बळीराजाचे “टेन्शन’ वाढत आहे.
परंपरागत पिकेच घेतली नाही
गेल्या हंगामात पाऊस चांगला झाल्याने जवळपास सर्व शेतकऱ्यांकडे सिंचनाच्या सुविधा उपलब्ध असल्याने परंपरागत पीक न घेता अनेक शेतकऱ्यांनी सुधारित पद्धतीने खरबूज टरबूज फळ वर्गीय पिके काकडी, दोडका, कार्ले, वेलवर्गीय पिके वांगे, कोबी, टोमॅटो आदी भाजीपाला घेतला होता. तर काढणीच्या हंगामात लॉकडाऊन झाल्याने उत्पादित माल कोठे विकावा या समस्येत बळीराजा सापडला आहे.
“थांबला तो संपल्या’चा देतोय संदेश
करोना विषाणू संक्रमणाच्या पार्श्वभूमीवर खेड तालुक्यतील बळीराजा खचून न जाता पुढील हंगामासाठी रणरणत्या उन्हात खरीप हंगामाची तयारी करण्यासाठी बळीराजा पुढे आला आहे. परिस्थिती कशीही असो आपण आपले काम नित्यनियमाने करीत “थांबला तो संपला’ असा संदेश बळीराजा आपल्या कर्तृत्वातून देत आहे.
बदलत्या चक्रामुळे बळीराजा हैराण
दरवर्षी पावसासाची अनियमितता आणि पारंपरिक पिकांमधील उत्पादकता याचा शेतकऱ्यांच्या अर्थव्यवस्थेवर मोठा परिणाम झाला आहे. तालुक्यातील शेतकरी पावसाच्या बदलत्या चक्रामुळे हैराण झाला आहे. शेतात कोणती पिके घ्यायची याबाबत संभ्रमात सापडला आहे. पावसाचे चक्र बदलल्याने शेतकरी नगदी पिकांकडे वळला आहे. खरीप हंगामातील भात, भुईमूग बटाटा पिकांपेक्षा कमी पावसात व नुकसान न होणाऱ्या सोयाबीन, मका या नगदी पिके घेण्याकडे त्यांचा कल वाढला आहे.
बांधावर कांदा किती दिवस सांभाळायचा
खेड तालुक्यात चाकणची बाजारपेठ खास कांद्यासाठी ओळखली जाते त्यामुळे तालुक्यातील बळीराजा कांद्याचे पीक मोठ्या प्रमाणात घेतो. आता पीक हातात आले असले तरी त्यास भाव नाही व मार्केटही उपलब्ध नाही. तर उत्पादनच्या धर्तीवर तेवढ्या कांदा चाळही उपलब्ध होत नसल्याने बांधावरील कांदा किती दिवस संभाळायचा, कारण कांदा जास्त दिवस टिकत नसून तो एका जागेवर राहील्यास सडतो. तर लॉकडाऊन उघडल्यानंतर शेतकऱ्यांच्या कांद्याला भाव मिळेल का? या बाबत शेतकऱ्यांना चिंता वाटत आहे.