“लॉकडाऊन’चा परिणाम : हंगाम वाया गेला, ऊसाचा चाऱ्याप्रमाणे वापर
पिंपरी – उन्हाळ्यात रसवंती गृहातील चाकांचा व घुंगरांचा आवाज सायंकाळपर्यंत येत असतो. त्यामधून व्यावसायिकाला व शेतकऱ्याला थोडीही उसंत मिळत नाही. मात्र यावर्षी चित्र वेगळे आहे. कडक उन्हाळ्यातही रसवंतीच्या घुंगराचा आवाज थांबला आहे. 21 मार्चपासून रसवंतीची चाके थांबल्याने सगळीकडे सन्नाटा पसरला आहे.
एप्रिल मे महिन्यात उन्हाचा पारा वाढल्यावर उसाच्या रसाच्या रसवंतीवर ग्राहकांची मोठ्या प्रमाणात गर्दी दिसून येते. यंदा “लॉकडाऊन’मुळे रसवंतीची चाके थांबली आहेत. त्यामुळे व्यावसायिक व शेतकऱ्यांवर उपासमारीची वेळ आली आहे. तर शेतकऱ्यांपुढे ऊस जनावरांना टाकण्याची वेळ आली आहे. त्यामुळे हंगाम वाया गेला आहे. उन्हाळ्यातील रणरणत्या उन्हात थंडगार रस पिण्यासाठी सगळ्यांचेच पाय रसवंतीकडे वळतात. त्यादष्टीने शहरात अनेक व्यावसायिक उन्हाळ्यामध्ये शेतकऱ्यांकडून ऊसाची खरेदी करतात.
तर मावळ भागामध्ये अनेक शेतकरी स्वतः रसवंती चालवतात. साधारण ऑक्टोबर नंतर म्हणजेच दिवाळी झाल्यावर रसवंती गृहे सुरु होतात. जून ते सप्टेंबर या पावसाळ्यातील चार महिन्यांच्या काळात रसवंती बंद असते. हिवाळ्यात ऊसाच्या रसाला उन्हाळ्याच्या तुलनेत कमी मागणी असते. मार्च ते जूनपर्यंत रसवंती गृहासाठी सुगीचे दिवस असतात. उन्हाळ्यातील तीन महिने रसाला सर्वाधिक मागणी असते. मात्र यावर्षी लॉकडाऊमुळे या उसाच्या रसाला ग्राहकांनाही मुकावे लागले आहे. तसेच व्यावसायिक व शेतकरी यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.
करोनाच्या संकटामुळे सर्वच व्यवसाय बंद झाले आहेत. त्यामध्ये रसवंतीचीही चाके थांबली आहेत. चार महिन्याच्या या व्यवसायावर सर्व अवलंबून असते. मात्र आता लॉकडाऊनमुळे मोठ्या आर्थिक संकटाला तोंड द्यावे लागणार आहे.
– कैलास डुंबरे, रसवंती व्यावसायिक