राहू, (वार्ताहर)- दौंड तालुक्यात ऊस तोडणी हंगाम उरकत आला आहे. कारखाना बंद होण्याअगोदर उभा ऊस कारखान्याला गाळपासाठी पेटवून घालवत आहेत. शेतकऱ्यांना या नैराश्येच्या ज्वालामुखी कळा सोसाव्या लागत आहे. कमी, अधिक प्रमाणात दरवर्षीच शेतकरी वेळेत ऊस पेटवून देऊन का होईना कारखान्याला पाठवत आहे.
एकाही शेतकऱ्याला तोडणीसाठी ऊस पेटवून द्यावा लागू नये, असे नियोजन गरजेचे आहे. गेल्या मान्सूनमध्ये पावसाचे प्रमाण घटल्याने यंदा उसाला बसला आहे. उसाचे प्रति हेक्टरी उत्पादन 20 ते 30 टक्के कमी होईल असा अंदाज होता. त्यामुळे यंदाच्या हंगामात कमी ऊस उपलब्ध होईल. साखरेचे उत्पादने घटेल, असा अंदाज होता. त्यानुसार हंगामाची संथगतीने सुरुवात झाली.
तोडणीला अडचणी येणार नाहीत, असे वाटत होते. परंतु यंदा उलटेच घडले आहे. अनेक कारखान्यांचे करार, टोळ्या फसल्या आहेत. त्यामुळे तोडीचे नियोजन कोलमडले. त्याची किंमत शेतकऱ्यांना भोगावी लागत आहे. नाईलाजाने शेतकऱ्यांना बारा महिने सांभाळलेला ऊस पेटून द्यावा लागत आहे.
ही मोठी शोकांतिका आहे. शेतकऱ्याने ऊस पेटवला किंवा पेटला तर कारखाना ठराविक रक्कम कमी करून घेतो. परंतु नुकसान मात्र शेतकऱ्यांचेच होते. ही वस्तुस्थिती आहे. अठरा अठरा महिने जीवापाड जपलेल्या उसाला आपल्याच हाताने काडी लावावी लागते. हे वास्तव आहे.
संघटनांनी लक्ष घालणे गरजेचे
आंदोलन करून योग्य ऊस दर घेतला जातो. परंतु त्यानंतर तोडणीमध्ये होणाऱ्या अडचणी मात्र दुर्लक्षित राहतात. कारण त्या वैयक्तिक पातळीवर असतात. त्यांना संघटनात्मक पातळीवर नेणे गरजेचे आहे. कारखान्यालाही याचे सोयरसूतक नसते. शेतकरी संघटनांनी यामध्ये लक्ष देण्याची गरज आहे. अन्यथा भांडून दोन रुपये दर वाढवून घ्यायचा व ऊस पेटवून त्याचा कोळसा करायचा, अशी स्थिती होत आहे. वीस ते तीस टक्के नुकसान करून घ्यायचे, हे शेतकऱ्यांच्या माथी नुकसानीचा भार आहे.
स्लीप मास्तरने ओळख दाखविलीच नाही
यंदा ऊस तुटवडा आहे, कारखाना आपल्याकडे येऊन विचारणा करील, अशी शेतकऱ्यांची अटकळ होती. परंतु हंगाम चालू झाल्यानंतर शेतकऱ्यांच्या पदरी निराशा येऊ लागली. कमी तोडणी यंत्रणा, उसाची सहज उपलब्धतेमुळे शेतकऱ्याकडे कोणी फिरकलेच नाही. याउलट शेतकऱ्याला फील्डमनला स्वतः हून ओळख देऊन फील्डमन, शेतकी अधिकारी, ते एमडीपर्यंत भेटी घेऊन ऊस नेण्याची विनंती करावी लागली आहे.