राजुरी, (वार्ताहर)- सध्या राज्यामध्ये सगळीकडेच ऊसतोडणी चालू आहे. ऊस तोडणी मजुरांना दोन वेळचे जेवण बनवण्यासाठी लागणारे सरपण गोळा करण्यासाठी मोठी कसरत करावी लागत आहे.
सध्या सगळीकडेच ऊस कारखाने सुरू आहेत. त्यासाठी गावोगावी ऊस तोडणी मजूर आपली झोपडी उभारून राहत आहेत. दररोज ऊस तोडणीसाठी वेगवेगळ्या शेतकर्यांच्या शेतात जावे लागते.
दिवसभरातील ऊस तोडणीचे काम आवरल्यानंतर घरी येताना दोन वेळचे जेवण बनवण्यासाठी गॅस अथवा रॉकेल अशी कोणतीच सुविधा उपलब्ध नसल्याने या ऊसतोडणी मजुरांना तीन दगडाच्या चुलीवर स्वयंपाक करावा लागतो.
त्यासाठी लागणारे सरपण मिळवण्यासाठी मोठी कसरत करावी लागत आहे. मिळेल त्या ठिकाणी सरपण गोळा करून ऊस तोडणी काम आवरल्यानंतर घरी येताना ते सरपण डोक्यावर घेऊन यावं लागतं आहे. त्यानंतर त्या सरपणावरती तीन दगडाच्या चुलीवरती ऊस तोडणी मजुरांना स्वयंपाक करावा लागतो.
याच ऊस तोडणी मजुरांच्या मुलांना शिक्षणासाठी काही ठिकाणी साखर शाळाही सुरू आहेत. तर काही ठिकाणी याच ऊस तोडणी मजुरांच्या मुलांना शिक्षणासाठी शाळा लांब असल्याने मोठी कसरत करावी लागत आहे.