पिंपरी – करोना विषाणूमुळे उद्भवलेल्या आपत्कालीन परिस्थितीमध्ये पोलिसांना बंदोबस्त करताना मनुष्य बळाची अडचण येत आहे. त्यातच काही पोलीस गैरहजर आहेत. त्यांना तत्काळ हजर होण्याचे आदेश दिले. तरीदेखील काहीजण जाणीवपूर्वक हजर होत नसल्याने त्यांना थेट निलंबित करण्यात आले आहे. याबाबत पोलीस आयुक्त संदीप बिष्णोई यांनी मंगळवारी (दि. २१) आदेश दिले आहेत.
डी. बी. कोकणे (निगडी), विठ्ठल भगत (पिंपरी), एस. एच. रासकर (भोसरी), रतन कांबळे (एमआयडीसी भोसरी), जगन्नाथ शिंदे (निगडी), एस. एस. जाधव (देहूरोड), नलिनी पिंपळकर (तळेगाव एमआयडीसी) अशी निलंबीत केलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांची नावे आहेत.
पिंपरी- चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत सुमारे ३५ लाख इतकी लोकसंख्येचा भाग येतो. मात्र, सुरक्षेची जबाबदारी पेलण्यासाठी केवळ तीन हजार पोलीस सध्या तैनात आहेत. रात्र आणि दिवस पाळी, साप्ताहिक सुट्या, किरकोळ रजा, आजारपण, कार्यलयीन कामकाज करणारे, विविध पथकांमधील पोलीस वगळता प्रत्यक्ष फिल्डवर काम करण्यासाठी अगदी थोडे मनुष्यबळ उरतात.
करोनाच्या पार्श्वभूमीवर सध्या शहरात जवळपास १०० ठिकाणी नाकाबंदी आहे. शहराच्या सीमा देखील बंद करण्यात आल्या आहेत. प्रशासनाने दिलेल्या आदेशाचे पालन न करणाऱ्या पाच हजार जणांवर आतापर्यंत कारवाई करण्यात आली आहे.
अशावेळी अपुऱ्या मनुष्यबळावर नियोजन करताना वरिष्ठांची दमछाक होऊ लागली आहे. त्यामुळे गैरहजर असलेल्या सर्व कर्मचाऱ्यांना हजर राहण्याच्या सूचना यापूर्वी करण्यात आल्या होत्या. मात्र, तरी देखील काहीजण हजर होण्यास जाणीवपूर्वक टाळाटाळ करीत असल्याचे लक्षात आल्याने पोलीस आयुक्त बिष्णोई यांनी थेट निलंबनाचे आदेश दिले आहेत. आयुक्तांनी घेतलेल्या या आक्रमक पवित्र्यामुळे पोलीस दलात एकच खळबळ उडाली आहे.