कोल्हापूर(प्रतिनिधी) – कोल्हापूर जिह्यात गुरुवारी रात्री झालेल्या वादळी वाऱयासह झालेल्या जोरदार पावसामुळे मोठमोठे वृक्ष वीज वाहिन्यांवर उन्मळून पडल्यामुळे शहरासह जिह्यातील अनेक विद्युत खांब कोलमडून पडले. शुक्रवारपर्यंत मिळालेल्या माहितीनुसार 454 वीज खांब जमीनदोस्त झाले असून हजारो खांबावरील विद्युत वाहक तारा तुटल्या आहेत. अशा परिस्थितीतही शुक्रवारी दिवसभरात शहर व गावठाणच वीज पुरवठा सुरळीत करण्यासाठी वीज कर्मचाऱयांनी अथक प्रयत्न केले.
महावितरणच्या मागील संकटाची मालिका काही केल्या कमी होत नाही. आधी महापूर आणि आता अवकाळी पावसाच्या तडाख्यामुळे वीज यंत्रणेला मोठा फटका बसला आहे. त्यात अवकाळीने भर घातली आहे. कोल्हापूर शहरातील शिरोली एमआयडीसी, कसबा बावडा, शिये, भुये, वडगणे या भागात जुने व मोठमोठे वृक्ष मुळासकट उन्मळून वीजवाहिन्यांवर पडले. एमआयडीसी भागातील पत्र्यांची शेड तारांवर अडकले. सर्वात मजबूत समजले जाणारे ‘रेल पोल’ सुध्दा अक्षरशः मोडून पडले.
एमआयडीसीतील बहुतांश उद्योग लॉकडाऊनमुळे बंद असले तरी वृत्तपत्र व आदी औद्योगिक ग्राहक ज्यांना लॉकडाऊनमधून वगळले आहे, त्यांचा वीजपुरवठा मार्केटयार्ड उपविभागाने रात्रीतून सुरु केला. कसबा बावडा व नागाळापार्क भागाला जिथे शक्य आहे, तिथे पर्यायी मार्गाने सुरु करण्यात आले आहे. गडहिंग्लज शहर पाणीपुरवठा योजनेचा वीजपुरवठा शुक्रवारी दुपारी युध्दपातळीवर पूर्ववत करण्यात आला.
प्राथमिक माहितीनुसार गुरुवारी रात्रीच्या अवकाळी पावसात उच्चदाबाचे 170 व लघुदाबाचे 284 असे 454 वीजखांब पडले होते. तर 11 रोहित्रसुध्दा जमीनदोस्त झाले आहेत. विजेच्या कडकडामुळे शेकडो खांबावरील ‘इन्सुलेटर’ फुटून तारा खांबावर निखळून पडल्या आहेत. लॉकडाऊनमुळे कंत्राटदारांना कामगार मिळत नसल्याने काल रात्रीपासून कर्मचारी अहोरात्र झटत आहेत. त्यांच्या मदतीला उद्यापासून काही पथके उपलब्ध होतील. त्यानंतर बाधित शेतीपंपाचा वीजपुरवठा पूर्ववत करण्याचे काम युद्धपातळीवर केले जाणार आहे.