घराघरात जाऊन सखोल आरोग्यतपासणी
संपूर्ण क्षेत्रात निर्जंतुकीकरणाची व्यवस्था
नवी दिल्ली : करोनाप्रभावित क्षेत्रांना हॉट स्पॉटच्या स्वरूपात चिन्हांकित करून कोरोना संक्रमणाच्या बचावासाठी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या नेतृत्वाखालील उत्तरप्रदेश सरकारतर्फे अवलंबिण्यात आलेल्या रणनीतीची संपूर्ण देशात प्रशंसा करण्यात येत आहे. कोविड-19 च्या संक्रमणावर नियंत्रण आणण्यासाठी यूपी मॉडेल अंतर्गत विशेष व्यूहरचना आखण्यात आली आहे, हे उल्लेखनीय ठरते आहे.
या मॉडेल अंतर्गत ज्या परिसरात कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण असेल तो परिसर संपूर्णपणे सील करण्यात येतो. पूर्णपणे सील केलेल्या या हॉट स्पॉट क्षेत्रात केवळ आरोग्य, सॅनिटेशन (स्वच्छता) कर्मचारी तसेच जीवनावश्यक वस्तू, रेशन पुरवठा करणारे पथकच जाऊ शकते. या काटेकोर उपाययोजनांमुळे संबंधित परिसरात लॉकडाऊन अतिशय प्रभावीपणे राबविता येतो.
प्रत्येक हॉटस्पॉट क्षेत्रांसाठी एक दंडाधिकारी आणि पोलिस अधिकाऱ्याची नेमणूक करण्यात येते. पाण्यात औषध टाकून अग्निशमक बंबातून संपूर्ण परिसरात फवारणी करण्याची व स्वच्छतेची व्यवस्था करण्यात येते. याशिवाय करोना पॉझिटिव्ह रोग्यांच्या संपर्कात आलेल्या सर्व (प्राथमिक, दुय्यम) लोकांची तपासणी करण्यात येते. हॉट स्पॉट क्षेत्रातील व्यक्ती जर घराबाहेर पडली तर कलम 188 अंतर्गत (जाणीवपूर्वक दुसऱ्याच्या मृत्युस कारणीभूत ठरणे) कारवाई करण्यात येते. जर एखादी व्यक्ती स्वत:जवळचे वाहन घेऊन घराबाहेर पडली तर दंड ठोठावून ते वाहन तत्काळ जप्त करण्यात येते.
याशिवाय हॉट स्पॉट क्षेत्रातील तपासणी झालेल्या प्रत्येक घरावर खूण (चिन्हांकित) करण्यात येते. तसेच घरात राहणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचे विवरण ठेवण्यात येते. परिसरात एकही पॉझिटिव्ह रुग्ण आढळू नये यासाठी ही सारी प्रक्रिया कमीतकमी दिवस अवलंबिण्यात यावी, असेही या मॉडेलमध्ये सूचित केले आहे.
सील करण्यात आलेल्या सर्व हॉट स्पॉट करोनाप्रभावित क्षेत्रात केवळ वैद्यकीय, स्वच्छता आणि जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा करणाऱ्या चमूंनाच प्रवेश देण्यात यावा असे कठोर आदेश मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी दिले आहेत. हॉट स्पॉट क्षेत्राला सेक्टरनिहाय विभाजित करून दंडाधिकारी तैनात करण्यात यावा, असेही आदेश आहेत.
20 एप्रिलपर्यंत राज्यातील हॉट स्पॉट सुनिश्चित करण्यात आले. हॉटस्पॉट क्षेत्रात घरपोच दूध वितरण बूथ तयार करण्यात आले असून फळे आणि भाज्यांचे घरपोच वितरण करण्यासाठी अनेक वाहनांची व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच या क्षेत्रात भोजनासाठी सामुदायिक स्वयंपाकघरे कार्यान्वित करण्यात आली आहेत.