मेढा – जावळी तालुक्यातील निझरे गावात सापडलेल्या दोन करोनाबाधितांमुळे सातारा जिल्ह्यासह जावळी तालुक्यावर संकटाचे ढग अधिक गडद झाले आहेत. जावळी तालुक्यातील सर्वच गावांमध्ये भयानक शांतता आहे. तालुक्यातील दोन रुग्ण निझरे येथे आढळल्यानंतर प्रशासन अधिक सतर्क झाले आहे. गावागावात जवळपास संचारबंदी लागू करण्यात आली आहे.
मेढापोलिसांचा गस्तीसाठी रोज 200 किमी प्रवास
जावळी तालुक्यात संचारबंदीचे तंतोतंत पालन व्हावे यासाठी मेढा पोलीस ठाण्याचे सपोनि नीळकंठ राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कर्मचाऱ्यांनी कंबर कसली आहे. क्षेत्रफळाने मोठ्या आणि अतिदुर्गम असलेल्या जावळी तालुक्यात गस्त घालण्यासाठी पोलिसांना रोज 200 किमीचा प्रवास करावा लागत आहे. सर्वच कर्मचारी आपापल्या परीने या संकटाशी लढा देत आहेत. नागरिकांनी मात्र घरात बसूनच या संकटाशी लढा द्यावा, असे आवाहन राठोड यांनी केले आहे.