राष्ट्रीय आपत्ती रोखण्यासाठी सर्वांच्या सहकार्याची गरज
गरिबांना नागरिकांनी मदतीचा हात पुढे करण्याचे आवाहन
अकोले – करोना हा महाभयंकर रोग डोळ्यांनी दिसत नाही. त्यामुळे लॉकडाऊनही करण्यात आले आहे. मात्र काही जण विनाकारण रस्त्यावर फिरत आहेत. त्यामुळे या कायदा मोडणाऱ्यांविरुद्ध कडक व कायदेशीर कारवाई करण्याची गरज आहे, अशा प्रकारची भूमिका विश्व हिंदू परिषदेचे क्षेत्रीय मंत्री शंकरराव गायकर यांनी मांडली.
अकोले येथे जनकल्याण समितीच्या बैठकीला ते आले असताना ते बोलत होते. ते म्हणाले, याप्रसंगी देशावर आलेले संकट निवारण्यासाठी पक्ष, जाती भेद विसरून सर्वांनी वज्रमूठ दाखवली पाहिजे. आज देशाच्या मदतीसाठी अनेकांचे हात पुढे येत आहेत. मात्र ही सेवा देणाऱ्यांनी त्याचे अवडंबर माजवता कामा नये. ज्यांना होम क्वारंटाईन केलेले आहे आणि ज्यांच्या हातावर शिक्के मारलेले आहेत ते आज राजरोसपणे फिरताना आढळतात, ही मोठी संताप आणणारी बाब आहे. या सर्वांना पोलिसांनी उचलून कडक कारवाई करून त्यांना बंदिस्त ठिकाणी ठेवले पाहिजे आणि त्यांना निगराणी खाली ठेवली पाहिजे असे ते म्हणाले.
असंख्य गरीब कुटुंबे आहेत आणि गरीब कुटुंबांच्या रोजगाराचा प्रश्न जसा आज अनेक ठिकाणी भेडसावतो आहे. तशीच त्यांची हातातोंडाची गाठ पडण्याची चिंताजनक परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे सेवाभावी संस्थांनी वेगवेगळे किट तयार करून जीवनावश्यक वस्तूंचा त्यात अंतर्भाव करून आणि गरजून पर्यंतच ती साधनसामग्री कशी पोहोचेल, याचबरोबर एकाच ठिकाणी अनेकांची मदत जाणार नाही, याकडे डोळे उघडे ठेवून काम केले गेले पाहिजे. सरकार सरकारचे काम करते आहे. आपण आपल्या पातळीवर एक जुटीने ताकदीने परस्परांना मदत करत अंतर्बाह्य अशा प्रकारची स्थानिक मदतीची योजना आखून स्वतःला बंदिस्त केले पाहिजे. आणि ‘साथी हात बढाना’ हा मंत्र जपला पाहिजे, अशी अपेक्षा केली.