दिवे – करोना व्हायरसचा सर्वांत मोठा फटका शेतकऱ्यांना बसला आहे. काबाडकष्ट करून पिकवलेला शेतीमाल विकायचा कोठे, असा गंभीर प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा ठाकला आहे. लॉकडाऊनमुळे शेतकरी मजुरांना सॅनिटायझर देऊन सोशल डिस्टन्सिंगचा वापर करीत कांदा काढणीची कामे करीत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांसमोर कांदा काढणीचे संकट कोसळले आहे.
शेतकऱ्यांना चार पैसे मिळवून देणारा कांदा करोनामुळे संकटात सापडला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी येण्याची शक्यता आहे. कांदा काढणीवेळी सुरूवातीला काही दिवस कांदा उत्पादकांच्या पदरी चार पैसे हातात पडले. परंतु एक महिन्यांपूर्वी काढणीला आलेला कांदा शेतातच पडून आहे. लॉकडाऊनमुळे गावेच्या गावे ओस पडली आहेत. त्यामुळे मजूर देखील मिळत नाहीत.
हा परिपक्व झालेला कांदा किती दिवस ठेवायचा, या चिंतेने शेतकरी ग्रासला आहे. संचारबंदी उठेल, या आशेवर मजूर लावून दोन मजुरांमध्ये सुरक्षित अंतर ठेवून कांदा काढणीला सुरूवात केली आहे. दिवे चिंचवलेवस्ती येथील कांदा उत्पादक शेतकरी शंकर झेंडे म्हणाले की, कांदा काढणीला मजुरच येत नव्हते. परंतु योग्य ती खबरदारी घेऊन सुरक्षित अंतर ठेवून मजुरांसाठी सॅनिटायझर सुद्धा उपलब्ध करून कांदा काढणी करीत आहे.