पुणे – करोनाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवार (दि. 5) देशभरातील वीज दिवे रात्री नऊ वाजता बंद करण्याचे आवाहन केले आहे. त्यानंतर अचानक सर्व वीज सुरू केल्यानंतर वीजपुरवठा अस्थिर होण्याची भीती व्यक्त केली जात आहे; परंतु वीज प्रवाहाचा विशिष्ट भार नियंत्रणाद्वारे सांभाळता येणे शक्य असल्याचे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे.
करोनाच्या पार्श्वभूमीवर देशभरातील जनतेचे मनोधैर्य वाढविण्यासाठी रविवारी रात्री 9 वाजता 9 मिनिट वीज प्रवाह बंद करण्याचे आवाहन पंतप्रधान मोदी यांनी केले आहे; परंतु भारतातील संपूर्ण वीज यंत्रणा ही “ग्रीड’ने जोडली आहे. राष्ट्रीय ग्रीड कॉर्पोरेशनअंतर्गत ती कार्यरत असते. त्यामध्ये अखंडित वीजवहन सुरू असते. वीजनिर्मिती केंद्रांची वीज या ग्रीडमध्ये येत असते. याखेरीज प्रत्येक राज्यातील वीजपुरवठा, वीजवितरण केंद्रांशी ही ग्रीड जोडलेली असते. जेव्हा विजेचा प्रवाह अस्थिर होतो तेव्हा प्रामुख्याने या ग्रीडला सांभाळणे आवश्यक असते. आता रविवारीदेखील 9 मिनिटे विजेची मागणी कमी झाल्यानंतर अचानक ती वाढेल तेव्हा या ग्रीडवरच भार येणार आहे. पण, तो सांभाळणे अशक्य नाही, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.
एप्रिल महिन्यात साधारण 20 हजार मेगावॅट वीज
देशाच्या एकूण वीज मागणीत दिव्यांचा भार साधारण 25 टक्के असतो. महाराष्ट्रात साधारण एप्रिलची विजेची मागणी 20 हजार मेगावॅट असते. त्यापैकी 2 हजार मेगावॉट दिव्यांचा भार असतो. सध्या लॉकडाऊनमुळे मागणी 14 हजार मेगावॅटवर आल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.