कुडाळ -लॉकडाऊनमुऴे गोरगरीब जनता, कामगार आणि कष्टकऱ्यांची अर्थव्यवस्थाही पूर्णपणे कोलमडली आहे. हातावर पोट असणाऱ्या गोरगरीब लोकांना जेवण मिळेल का नाही.
अशी परिस्थिती निर्माण झाली आहे याची जाणीव ठेवत जावळीचे तहसीलदार शरद पाटील, गट विकास अधिकारी सतीश बुद्धे व सहाय्यक पोलीस निरीक्षक नीळकंठ राठोड आदी तालुक्याच्या प्रमुख अधिकाऱ्यांनी मिळून संयुक्तपणे कुडाळ (ता. जावळी) परिसरातील गोरगरीबांच्या वाडीवस्त्यांवर जाऊन ऊसतोड कामगारांसमवेत सर्वांची परिस्थितीबद्दल विचारपूस केली व आपल्या सर्व अडचणीसाठी प्रशासन खंबीर असल्याचेही सांगितले.
करोनाबद्दलची सविस्तर माहिती देऊन घ्यावयाच्या काळजीसाठीची माहिती देण्यात आली. हातावरील पोट असणाऱ्या जनतेला या तीन अधिकाऱ्यांनी सात ते आठ दिवस पुरेल एवढ्या जीवनावश्यक वस्तू देऊन एक प्रकारे या सर्व कुटुंबांना आधार दिला. त्यांना घरीच थांबण्याचे आवाहन करून मदत देण्याचे आश्वासनही दिले.