मुंबई – राज्यात मुंबई हे करोना या संसर्गाचे केंद्र ठरत आहे. आता मध्यवर्ती मुंबईतील वरळी कोळीवाडा येथे 4हून अधिक करोना संशयित रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे वरळी कोळीवाडासह दोन वसाहती सील करण्यात आला आहे.
मागील 2 दिवसांत त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आले आहे. त्यामुळे आरोग्य यंत्रणांसह पोलीस प्रशासन हायअलर्टवर असल्याचे पाहायला मिळत आहेत. कोळीवाड्यात जाण्यासाठी पूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे. तसेच कुणाला बाहेरही येऊ दिले जात नाही. या परिसरात निर्जंतुकीकरण फवारणी देखील युद्धपातळीवर सुरु करण्यात आली आहे, अशी माहिती मंत्री आदित्य ठाकरे यांनी ट्विटरवरून दिली आहे.
वरळी कोळावाडा परिसरात काल संशयित रुग्ण आढळल्याने पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन रात्रीच हा परिसर सील केला होता. कोणालाही घराबाहेर पडण्यास मज्जाव करण्यात आले. त्यानंतर महापालिका प्रशासनाने इथे निर्जंतुकीकरण मोहीम हाती घेतली.
त्यानंतर सोमवारी (30 मार्च) वरळीतील कोळीवाडा इथे संशयित रुग्णांचा आकडा वाढला. त्यामुळे आधीच बंद केलेल्या कोळीवाड्यात आणखी खबरदारी घेण्यात आली. कोळीवाड हा प्रचंड दाटीवाटीने लोकवस्ती असलेला परिसर आहे. येथे बैठ्या चाळीत नागरिक राहतात. त्यामुळे येथे करोनाचा संसर्ग झाल्यास मुंबईवरील करोनाचा धोका अनेक पटीने वाढण्याची शक्यता आहे. हाच धोका लक्षात घेऊन संशयित रुग्ण आढळल्यानंतर महापालिका प्रशासनासह इतर यंत्रणा अलर्ट झाल्या आहेत.
या परिसरात अत्यंत काटेकोरपणे निर्जंतुकीकरण फवारण्या करण्यात येत आहेत. या परिसरात गेलेल्या पोलिसांच्या गाड्यांवरही निर्जंतुकीकरण फवारण्या केल्या जात आहेत. दरम्यान, कोळीवाडा येथे करोना संशयित सापडल्यानंतर परिसरात भीतीचे वातावरण आहे. तेथील नागरिक हा संसर्ग रोखावा अशी मागणी करत आहेत.