टाकळी ढोकेश्वर – राजकारण हे फक्त निवडणुकीपुरते मर्यादीत ठेवा. त्यानंतर गावातील सर्व गट-तट बाजूला ठेवून गावाच्या विकासासाठी एकत्र या. राजकारणी कधीही एक होतात. त्यामुळे यापुढील काळात लबाड पुढाऱ्यांप्रमाणे आता लबाड कार्यकर्ते तयार होणे गरजेचे असल्याचा सल्ला खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी कार्यकर्त्यांना दिला.
ढोकी (ता. पारनेर) येथील खासदार आपल्या दारी उपक्रमात ते बोलत होते. यावेळी सभापती गणेश शेळके, भाजपचे तालुकाध्यक्ष वसंत चेडे, दूध संघाचे राहुल शिंदे, विश्वनाथ कोरडे, सुभाष दुधाडे, डॉ. भाऊसाहेब खिलारी, संदीप सालके, अमोल साळवे, सरपंच बाबासाहेब नऱ्हे, ऍड. पांडुरंग गायकवाड, अरुण ठाणगे, विलास झावरे, शिवाजी खिलारी, बाळासाहेब नरसाळे, उमाजी वाळुंज आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.
खा. विखे म्हणाले, सत्ता येईल, या अपेक्षेने भाजपमध्ये काही प्रवेश झाले. मात्र आम्ही कॉंग्रेस पक्षाशी एकनिष्ठ राहीलो. जिल्ह्यात पक्षाची ताकद वाढवली. मात्र आम्हाला सुडबुद्धीने लोकसभेचे तिकीट नाकारले.
आम्ही सत्तेच्या पाठीमागे पळत नाहीत. जिल्ह्यातील जनतेने कायम आम्हाला स्वीकारले आहे. लोकसभेवेळी आम्हाला भाजपने आधार दिल्याने आम्ही हा पर्याय स्वीकारला. अपवादात्मक आलेले सरकार टिकत नसते. कर्नाटकमध्ये काय झाले. आता मध्यप्रदेश मध्ये काय होणार आहे, हे आपण सर्व पाहणारच आहोत. महाराष्ट्रातही सत्ता लवकरच येईल.
सूर्य योग्यच ठिकाणीच उगवला
महाराष्ट्रातील जनतेने भाजप व शिवसेना या युतीलाच कौल दिला आहे. मात्र आमचा सूर्य योग्य ठिकाणीच उगवला आहे. अपवादात्मक आलेल्या सत्तेवरील भाषणावर मी काय टीका करणार, असा टोला खा. सुजय विखे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना लगावला आहे.