मुंबई : शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या दैनिक सामनाच्या संपादकपदी आजपासून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे या दैनिक सामनाच्या संपादक असणार आहेत. रश्मी ठाकरे यांच्या या नियुक्तीसह त्यांना सामनाच्या पहिल्या महिला संपादक होण्याचा सन्मान मिळाला आहे.
दरम्यान, उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेण्यापूर्वी ‘सामना’ दैनिकाचं संपादकपद सोडलं होतं. त्यानंतर ही जबाबदारी कुणाकडे दिली जाणार याविषयी बरीच उत्सुकता होती. रश्मी ठाकरे यांच्या निवडीनंतर या पदावर ठाकरे कुटुंबातीलच व्यक्ती असणार हे आता स्पष्ट झाले.
सामनाची सुरुवात झाली तेव्हा बाळासाहेब ठाकरे हे संपादकपदी होते. त्यांच्यानंतर उद्धव ठाकरे हे सामनाचे संपादक राहिले. पण आता मुख्यमंत्री झाल्यामुळे लाभाच्या पदावरून अडचणी निर्माण झाल्या आहेत. त्यामुळे हे संपादकपद रश्मी ठाकरे यांच्याकडे देण्यात आलं आहे. आजच्या सामनामध्ये संपादक सौ रश्मी ठाकरे असा उल्लेखदेखील करण्यात आला आहे. त्यामुळे त्या सामनाचं कामकाज कसं पाहतात हे बघणं महत्त्वाचं आहे.
लाभाच्या पदावरून शंका उपस्थित होत असल्यामुळे उद्धव ठाकरे यांनी संपादकपद सोडलं. खरंतर उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाल्यापासून रश्मी ठाकरे या राजकारणात ऍक्टिव्ह दिसल्या. त्यामुळे त्या राजकारणात येणार अशाही चर्चा रंगल्या होत्या. रश्मी ठाकरेंनी महिला आघाडीचं काम पाहिलं आहे पण त्या कधीच कोणत्याही पदावर नव्हत्या. पण आता त्यांना सामनाचं संपादकपद देण्यात आलं आहे. तर कार्यकारी संपादक म्हणून शिवसेनेचे खासदार संजय राऊत काम पाहतात.