आरोपीकडे पत्र नेमके कुठून आले ?-अजित पवारांचा सवाल
मुंबई : राज्यातील एल्गार परिषद आणि त्यानंतर एक जानेवारी 2018 रोजी पुणे जिल्ह्यातील भीमा-कोरेगाव इथे झालेला हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर अटक करण्यात आलेल्या आरोपींचा मुद्दा राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी महिन्याभरापूर्वी उपस्थित केला होता. या प्रकरणी विशेष तपास पथक (एसआयटी) नेमले जावे, अशी सूचना त्यांनी आपल्याच पक्षाच्या महाविकास आघाडी सरकारला केली होती. या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार आणि राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी या प्रकरणाचा आणि पोलिस तपासाचा आढावा घेतला.
मंत्रालयात झालेल्या या बैठकीला अतिरिक्त मुख्य सचिव संजयकुमार, पोलिस महासंचालक सुबोध जैयस्वाल, राज्य गुप्तचर विभागाच्या आयुक्त रश्मी शुक्ला, पोलिस सहायक आयुक्त शिवाजी पवार, विशेष महानिरीक्षक रविंद्र कदम हे या बैठकीला उपस्थित होते. शिवाजी पवार हेच या प्रकरणाचे तपास अधिकारी आहेत. त्याचबरोबर या प्रकरणी आरोपींना अटक करण्यात आली त्यावेळी रविंद्र कदम हे पुण्याचे सहआयुक्त होते.
या प्रकरणात अटक करण्यात आलेले आरोपी रोना विल्सन यांच्याकडे सापडलेल्या ते पत्र नेमके कुठून आले होते, याचीही माहिती सरकारने पोलिसांकडे विचारली. याच पत्राचा पुणे पोलिसांनी मुख्य पुरावा म्हणून वापर केला आहे. देशातील मोदी राज संपवायचा उल्लेख या पत्रामध्ये करण्यात आला आहे. या प्रकरणात पुणे पोलिसांनी आतापर्यंत दोन आरोपपत्र दाखल केले आहेत. पुणे पोलिसांनी या संदर्भात अटक करण्यात आलेल्या आरोपींविरोधात कोणकोणते पुरावे गोळा केले आहेत, याचीही माहिती पोलिसांकडून घेण्यात आली. आरोपपत्रांमध्ये आरोपींविरोधात लावण्यात आलेले आरोप योग्य आहेत का, त्याचे सबळ पुरावे आहेत का, याचीही माहिती पोलिसांकडून घेण्यात आली.