प्रभागातील कामे होत नसल्याची तक्रार; मालमत्ता करात अन्यायकारक 19 टक्के वाढ
कराड – मलकापूर नगरपरिषदेचे सत्ताधारी विरोधकांच्या कामांना प्राधान्य देत नाहीत, निवेदने देऊनही प्रभागातील कामे होत नाहीत, मालमत्ता करात 19 टक्के अन्यायकारक वाढ केली आहे. यासह विविध विषयांवरुन भाजपा नगरसेवकांनी सत्ताधाऱ्यांविरोधात बुधवारी मलकापुरात उपोषण सुरु केले.
शेतीमित्र अशोकराव थोरात यांच्या नेतृत्वाखाली हे उपोषण सुरु झाले असून गटनेत्या नुरजहॉं मुल्ला, विरोधी पक्षनेते अजित थोरात, नगरसेविका सौ. निर्मला काशिद, नगरसेवक दिनेश रैनाक, आबासाहेब सोळवंडे, डॉ. सौ. सारिका गावडे, राजू मुल्ला, आण्णासो काशिद, भरत जंत्रे व भाजपचे कार्यकर्ते उपस्थित होते.
मलकापूरमध्ये एककल्ली कारभार सुरु असून हेतुपुरस्सर विरोधी नगरसेवकांच्या प्रभागातील कामे टाळली जात आहेत. तसेच गरज नसताना सत्ताधाऱ्यांनी सर्वसाधारण सभेत मालमत्ता करात 19 टक्के एवढी अन्यायकारक वाढ केली. त्याचबरोबर वृक्ष कर, शिक्षण कर, कचरा संकलन कर, व्यवसाय कर यामध्येही वाढ झाली आहे. ही करवाढ त्वरित मागे घेण्यात यावी. पालिकेने नगरपंचायत झाल्यापासून मुख्य रस्ते सोडून अंतर्गत रस्ते कधीच डांबरी केलेले नाहीत.
विरोधकांच्या घरांकडे जाणारे रस्ते मुद्दामहून तयार केले नाहीत. विरोधी नगरसेवकांच्या वॉर्डातील रस्ते मागणी करुनही केले नाहीत. भुयारी गटर योजनेच्या नावाखाली गेली 6 वर्ष सर्व विभागातील गटर बांधलेली नाहीत. फुटलेली गटारे दुरुस्त केली नाहीत. यामुळे शहरात डासांचे प्रमाण वाढले आहे. शौचालयाच्या सेफ्टी टॅंक मधून बाहेर पडणारी दुर्गंधी सर्वत्र पसरलेली आहे. उघड्यावर सोडलेले गटरचे पाणी त्वरित बंद करावे व फुटलेली गटर त्वरित दुरुस्त करावी.
भूयारी गटर योजनेत आतापर्यंत 60 कोटी रुपये खर्च झाले. नागरिकांकडून कोट्यावधी रुपये जमा केले. विकास आराखड्यात अनेक ठिकाणी रस्ते दाखविले नाहीत. लक्ष्मीनगर, आगाशिवनगर, शास्त्रीनगर, यशवंतनगर, अहिल्यानगर भागात शेतकरी भाजी मंडई उभी करावी, मलकापूर फाट्यावरील वाहतूक कोंडी बंद करावी, पालिका कर्मचारी असुरक्षित असून त्यांच्या आर्थिक व्यवहारांवर निर्बंध आणले जातात, रोजंदारीवरील कर्मचाऱ्यांना वेळेवर पगार नाही, कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण नाही, मुस्लिम दफनभूमी व ईदगाह मैदान व्हावे या मागण्यांसाठी याआधी सत्ताधाऱ्यांकडे पाठपुरावा केला आहे. मात्र निवेदने देऊनही प्रभागातील विकासकामे केली जात नाहीत. त्यामुळे अशोकराव थोरात यांच्या नेतृत्वाखाली भाजपच्या सर्वच नगरसेवकांनी उपोषणाला सुरुवात केली आहे.