कॅबिनेटमध्ये विस्तृत प्रस्तावावर 22 जानेवारी रोजी होणार चर्चा
मुंबई – राज्याचे पर्यटन आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी घेतलेल्या “नाईट लाईफ’च्या निर्णयाला गृहमंत्री अनिल देशमुख यांनी खो घातल्याने हा निर्णय लांबणीवर पडण्याची शक्यता आहे. नाईट लाईफबाबत विस्तृत प्रस्तावावर 22 जानेवारी रोजी कॅबिनेटमध्ये पहिल्यांदा चर्चा होणार अहो. त्यानंतरच नाईट लाईफसंदर्भात योग्य निर्णय होऊ शकेल, अशी माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली आहे.
आदित्य ठाकरे यांनी नाईट लाईफबाबतचा निर्णय घेतल्यानंतर 26 जानेवारीपासून या निर्णयाची प्रायोगिक तत्वावर अंमलबाजवणी सुरू होणार होती. मात्र अनिल देशमुखांच्या वक्तव्यामुळे 26 जानेवारीपासून हा निर्णय लागू होणार की नाही, असा प्रश्न निर्माण झाला आहे.
सध्या पोलिसांवर मोठा ताण आहे. पोलीस 12 ते 14 तास रोज काम करत आहेत. इतक्या कमी वेळेत नाईट लाईफ सुरू करण्यासाठी लागणारी यंत्रणा अजून तयार नाही. नाईट लाईफच्या निर्णयानंतर त्यासाठी अतिरिक्त पोलीस आहेत का? याची माहिती घ्यावी लागेल. त्यानंतर याबाबतचा निर्णय घेतला जाईल, असे देशमुख म्हणाले. याबाबत सर्व माहिती घेऊन आढावा घेतला जाईल. मात्र या 26 जानेवारीपर्यंत अंतिम निर्णय होईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
यामुळे नाईट लाईफच्या निर्णयाची घोषणा करताना पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांनी घाई केली का? नाईट लाईफबाबतचा निर्णय घेताना संबंधित इतर खात्यांच्या मंत्र्यांशी चर्चा केली नाही का? असे प्रश्न आता उपस्थित होत आहेत. त्यामुळे नाईट लाईफ येत्या 26 जानेवारीपासून सुरु होणार की नाही, हे 22 जानेवारी रोजी होणाऱ्या मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर स्पष्ट होईल.
दरम्यान, मुंबईत 26 जानेवारीपासून प्रायोगिक तत्वावर नाईट लाईफ सुरु करण्याचा निर्णय आदित्य ठाकरे यांनी घेतला आहे. त्यानुसार मुंबईत अनिवासी भागातील सर्व थिएटर, मॉल्स, रेस्टॉरंटस् 24 तास खुले ठेवण्यास परवानगी दिली जाणार आहे. नरिमन पॉईंट, काला घोडा, बीकेसी, कमला मिल अशा मुंबईतील अनिवासी भागात नाईट लाईफ सुरु होणार आहे.