विज्ञानविश्व : डॉ. मेघश्री दळवी
मेघांनी आच्छादित काळ्याभोर आकाशातून विजेचा लोळ जमिनीकडे झेपावताना आपण अनेकदा पाहतो. साधारणपणे कम्युलोनिंबस प्रकारच्या ढगांमधून निघणाऱ्या या शक्तिशाली विद्युतरेखेमुळे उत्पातदेखील घडत असतात. एका पाहणीनुसार जगभरात दरवर्षी अडीच लाखाइतक्या वीज पडण्याच्या घटना नोंदल्या जातात, त्यात सुमारे सहा हजार माणसं दगावतात आणि अब्जावधी डॉलर्स इतका आर्थिक फटका बसतो.
वीज पडल्याने लागणाऱ्या आगी, विद्युतपुरवठा ठप्प होणे, विमानांना धोका, कारखाने आगीत भस्म होणे अशा अनेक प्रकारे नुकसान होत असतं. हे टाळण्यासाठी आपण शक्य तितके प्रयत्न करतच असतो.
मात्र, कोणत्याही धोकादायक घटनेचा आधी अंदाज बांधून वेळीच प्रतिबंधात्मक उपाययोजना करता येतील का याकडे लक्ष ठेवणं गरजेचं होतं. म्हणूनच आजवरच्या विविध स्टॅटिस्टिक्सचा आधार घेऊन वीज पडण्यामागे काही गणित मांडता येईल का, यावर संशोधन सुरू असतं.
हवामान बदलाचं संकट भेडसावत असताना, त्यामुळे वीज पडण्याचं प्रमाण वाढत जाणार आहे याकडे काही अमेरिकन आणि चिनी तज्ज्ञ मंडळींनी लक्ष वेधलं आहे. या शतकाच्या मध्यापर्यंत हे प्रमाण आजच्या दुप्पट होईल हा अदमास भयावह आहे खरा, पण त्याच वेळी दुसऱ्या बाजूने दिलासा मिळतो आहे तो एआयच्या (आर्टिफिशिअल इंटेलिजन्सच्या) मदतीने वीज कधी पडू शकेल याचा विश्वासार्ह असा अंदाज मिळण्याचा.
स्वित्झर्लंडमधील फेडरल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी इथला संशोधकांचा एक चमू या लाइटनिंग प्रेडिक्शन सिस्टिमवर काही वर्षे काम करत आहे. सुमारे तीस चौरस किलोमीटर परिसरात येत्या अर्ध्या तासात वीज पडणार आहे का, याचा बऱ्यापैकी खात्रीशीर अंदाज ही सिस्टिम आता देऊ शकते. त्यासाठी गेल्या अनेक वर्षांमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी वीज पडल्याच्या घटना आणि त्यावेळची हवामानाची सगळी मोजमापं याचा पूर्ण डेटा या संगणक प्रणालीत भरला आहे. हवामानाची स्थिती आणि त्याचा वीज पडण्याशी परस्परसंबंध (को-रिलेशन) याचा सखोल अभ्यास या एआय प्रणालीने केला. वातावरणाचा दाब, तापमान, सापेक्ष आर्द्रता आणि वाऱ्याचा वेग या चार महत्त्वाच्या घटकांचा विचार करून अमुक प्रकारचं हवामान असेल, तर वीज पडण्याची शक्यता तमुक इतकी असते असा आडाखा ती बांधू शकते. हा अंदाज ऐंशी टक्के वेळा बरोबर येताना दिसत आहे.
तीस चौरस किलोमीटर आणि अर्धा तास हे यश छोटं वाटलं, तरी ते योग्य दिशेने घेऊन जाणारं एक पाऊल आहे. आजच्या या अंदाजाचा उपयोग विमान उड्डाण करावं का, आणि त्याचा मार्ग सुरक्षित आहे का, यासाठी होऊ शकतो. कारखान्यांना धोका असेल, तर त्यातल्या कर्मचाऱ्यांना तत्काळ सुरक्षित जागी हलवण्यासाठी होऊ शकतो. त्यामुळे संशोधकांचा हा गट आता उत्साहाने पुढील टप्प्यावर काम करायला सज्ज झाला आहे.