सातारा – वाळूचा अवैध उपसा सुरू असलेल्या ठिकाणी पंचनामा करण्यासाठी गेलेल्या तलाठ्याला मारहाण करणाऱ्या श्रीधर उर्फ बाळू कल्याण खराडे (रा. ताथवडा, ता. फलटण) याला सक्तमजुरीची शिक्षा सुनावण्यात आली. याप्रकरणी तलाठी आत्माराम नाना गिऱ्हे (रा. गोळीबार मैदान, सातारा) यांनी फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती.
याबाबत अधिक माहिती अशी की, ताथवडा येथील पुलाजवळ दि. 23 फेब्रृवारी 2016 रोजी झालेल्या अवैध वाळू उपशाचा पंचनामा करण्यासाठी तत्कालीन गाव कामगार तलाठी आत्माराम गिऱ्हे सहकारी दत्तात्रय जाधव यांच्यासमवेत घटनास्थळी गेले होते. त्यावेळी आरोपी खराडे याने त्यांना पंचनामा करण्यास विरोध केला. त्यावर गिऱ्हे यांनी आपण शासकीय काम करत असल्याचे सांगत पंचानम्याला सुरूवात केली.
त्यामुळे चिडलेल्या आरोपीने गिऱ्हे यांच्या डोक्यात दगड मारून त्यांना जखमी केले होते. जखमी गिऱ्हे यांना दत्तात्रय जाधव यांनी फलटण येथील खासगी रुग्णालयात दाखल करून त्यांच्यावर उपचार सुरू केले. त्यानंतर गिऱ्हे यांनी फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात आरोपीच्याविरोधात मारहाणीची तक्रार दिली होती. गिऱ्हे यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपीवर शासकीय कामात अडथळा आणल्याचा व मारहाणीचा गुन्हा दाखल करून त्याला अटक केली होती.
या खटल्यात आरोपीवरील दोषारोपपत्र न्यायालयात दाखल झाल्यानंतर न्यायाधीश एन.एल. मोरे यांनी सरकारी वकीलांनी केलेला युक्तीवाद व फलटण ग्रामीण पोलीस ठाण्याचे तत्कालीन पोलीस निरीक्षक आण्णासाहेब घोलप, उपनिरीक्षक एस.के. शिंगटे यांची साक्ष ग्राह्य धरून आरोपीला तीन महिने सक्तमजुरी व दोन हजार रुपये दंड तसेच दंड न भरल्यास पंधरा दिवस साधी कैद अशी शिक्षा सुनावली. या खटल्यात पोलीस पैरवी अधिकारी म्हणून हवालदार मुस्ताक शेख यांनी काम पाहिले.