रोहतक: रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेतील महाराष्ट्राचा पहिला डाव दुसऱ्या दिवशी खेळ थांबला तेव्हा 4 बाद 88 असा गडगडला. हरयाणाने पहिल्या डावात 401 धावा केल्या आहेत. महाराष्ट्र 313 धावांनी पिछाडीवर आहे.
महाराष्ट्राचा ऋतुराज गायकवाड लवकर बाद झाल्यानंतर स्वप्निल गुगळे व चिराग खुराणाने डाव सावरण्याच्या प्रयत्न केला मात्र त्याचे बळी लवकर घेण्यात हरयाणाच्या गोलंदाजांना यश आले. टीनू कुंडू याने 2 गडी बाद केले. दिवसअखेर नौशाद शेखने सत्यजित बच्छावच्या साथीत संघाचे आणखी नुकसान होऊ दिले नाही. खेळ थांबला तेव्हा नौशाद 23 तर बच्छाव 5 धावांवर खेळत आहेत.
मुंबईचे बडोद्यावर वर्चस्व
शम्स मुलाणी व शार्दुल ठाकूर यांच्या भक्कम फलंदाजीच्या जोरावर मुंबईने रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेच्या पहिल्याच सामन्यात बडोद्या संघावर दडपण राखण्यात यश मिळविले. मुलाणी व ठाकूर यांनी आक्रमक फलंदाजी करताना अर्धशतके फटकावताना संघाला 400 धावांचा पल्ला गाठून दिला.
मुलाणीचे शतक मात्र हुकले. बडोदा संघाने केदार देवधरच्या दीडशतकी खेळीच्या जोरावर मुंबईच्या गोलंदाजांवर दडपण आणले होते. फलंदाजीत चमकलेल्या मुलाणीने गोलंदाजीतही कमाल करताना 5 गडी बाद केले व त्यांच्या डावाला खिंडार पाडले.