काठमांडू: भारताच्या क्रीडापटूंनी दक्षिण आशियाई क्रीडा स्पर्धेवर अपेक्षेप्रमाणे वर्चस्व राखताना गतवर्षीची 309 पदकांची कामगिरी मागे टाकत पदकांचे त्रिशतक पूर्ण करत एकूण 312 पदकांची कमाई केली. भारताने कुस्ती, बॅडमिंटन, खो-खो, कबड्डी, मुष्टियुद्ध, वुशू, स्क्वॅश, फुटबॉल, नेमबाजी व मैदानी क्रीडा प्रकारात सर्वात जास्त पदके मिळविताना दक्षिण आशियाचे आम्हीच राजे असल्याचे सिद्ध केले. विजेतेपद मिळविताना यशस्वी कामगिरीने स्पर्धेचा समारोप केला.
मंगळवारी स्पर्धेचा समारोप झाला. या स्पर्धेत भारतीय संघाने सलग 13 वर्षे सर्वाधीक पदके मिळविण्याची परंपरा कायम राखली. संघाने श्रीलंका आणि पाकिस्तानच्या आव्हानातील हवाच काढून टाकताना आगामी काळात देशाला आता ऑलिम्पिकमध्येही यश मिळेल हा विश्वास दिला. भारतीय मुष्टीयुद्ध खेळाडूंनी स्पर्धेतील सर्व 16 पदके जिंकून आणखी एक विक्रम साकार केला. विकास कृष्णन व पिंकी राणीने नेपाळ, पाकिस्तान यांचे आव्हान मोडून काढताना जपानमध्ये होणाऱ्या ऑलिम्पिक स्पर्धेतील यशाच्या आशा वाढविल्या आहेत.
स्पर्धेच्या पहिल्या दिवशी यजमान नेपाळने पदकतालिकेत आघाडी घेतली होती मात्र नंतरचे सर्व दिवस भारतीय खेळाडूंनी गाजविले. प्रत्येक दिवशी पदकांची रास ओतताना पदकतालिकेतील आघाडी दुसऱ्या दिवसापासून सातत्याने कायम राखली. गतवर्षी भारताने 309 पदकांची कमाई केली होती, यंदा ही कामगिरी मागे टाकत 312 पदकांची नोंद केली. दीडशेपेक्षा जास्त सुवर्णपदके मिळविताना सहभागी असलेल्या सगळ्या देशांना मागे टाकले.