जादा पाणी उचलत असल्याचा दावा : पाटबंधारेचे पालिकेला पत्र
पुणे – महापालिकेच्या वाढीव पाणी घेण्यावर पाटबंधारे विभागाने पुन्हा आक्षेप घेतला आहे. जलसंपत्ती नियामक प्राधिकरणाने दिलेल्या आदेशापेक्षा महापालिका अधिक पाणी वापरत असून मंजूर केलेल्या कोट्यानुसार, पाणी न वापरल्यास उन्हाळ्यात पिण्याच्या तसेच सिंचनासाठीच्या पाणी टंचाईचा सामना करावा लागेल, असा इशारा देण्यात आला आहे.
एका बाजूला महापालिका आणि पाटबंधारे विभागात अजूनही पाणीकरार झालेला नसतानाही पाटबंधारे विभागाकडून वारंवार पालिकेस पाणी वापराचे पत्र देण्यात येत असल्याने धरणात यंदा पुरेसे पाणी असूनही शहराला पाणीकपातीचा सामना करावा लागण्याची शक्यता आहे. पाटबंधारे विभागाचे सहायक अधीक्षक अभियंता न. व्य. कुलकर्णी यांनी हे पत्र महापालिकेस पाठविले आहे.
महापालिका आणि पाटबंधारे विभागातील पाणी करार ऑगस्ट 2019 मध्ये संपुष्टात आला आहे. त्यानंतर आता पालिकेकडून शासनाकडे शहरासाठी 14.12 टीएमसी पाण्याची वार्षिक पाण्याची मागणी केलेली असतानाच, या पाणीकोट्यास मंजुरी मिळाली नसल्याने पुन्हा पालिकेस 2013 प्रमाणेच 11.50 टीएमसी पाणीकरार करण्याची वेळ आली आहे. त्यातच शहराच्या पाणी वापराबाबत जलसंपत्ती नियामक प्राधिकरणाकडे दाखल झालेल्या एका याचिकेच्या सुनावणीत प्राधिकरणाने महापालिकेस 1 जुलै 2019 ते 30 जून 2020 पर्यंत 10.84 टीएमसी (दररोज 840 एमएलडी) पाणी देण्याचा निर्णय दिला आहे.
मात्र, प्रत्यक्षात महापालिकेकडून मार्च 2019 मध्ये शहराच्या पाण्यासाठी झालेल्या बैठकीत तत्कालीन जलसंपदामंत्र्यांनी दिलेल्या आदेशानुसार, दररोज 1,450 एमएलडी पाणी उचलण्यात येत आहे. त्यावर गेल्या सहा-आठ महिन्यांत पाटबंधारे विभागाने जवळपास 10 हून अधिक पत्र पाठविण्यात आली असून, त्यात आणखी एका पत्राची भर पडली आहे. या पत्रातही या जादा पाणी वापरामुळे पिण्याच्या आणि शेतीच्या पाण्याची टंचाई निर्माण होऊ शकते.