काठमांडू: भारताने दक्षिण आशियाई क्रीडा स्पर्धेतील आपले वर्चस्व चौथ्या दिवशीही कायम राखले. बॅडमिंटनमध्ये आज भारताने आणखी दोन पदके निश्चित केली. अश्मिता छलिया आणि गायत्री गोपिचंद यांनी महिला एकेरीत अंतिम फेरी गाठली आहे.
अश्मिताने श्रीलंकेच्या अचिनी रत्नासिरीवर 21-5, 21-7 अशी सहज मात केली. अन्य सामन्यात गायत्रीने श्रीलंकेच्याच देलमी दियासचा 21-17, 21-14 असा पराभव केला. तीने गायत्रीला चांगलीच लढत दिली मात्र तिचा अनुभव कमी पडला व गायत्रीला सामन्यावर वर्चस्व गाजविण्याची संधी मिळाली. आर्यमान टंडनने नेपाळच्या रत्नजित तमांगवर अटीतटीच्या सामन्यात पुरुष गटात 21-18, 14-21, 21-18 असा विजय मिळविला.
सिरील वर्माने श्रीलंकेच्या दिनुका करुणारत्नेचा 21-9, 21-12 असा पराभव केला. पुरुषांच्या दुहेरीत उपांत्य लढतीत कृष्णा गर्गने ध्रुव कपिला जोडीने पाकिस्तानच्या महंमद अतिक व रझा महंमद हुसेन जोडीचा 21-15, 21-7 असा सहज पराभव करत अंतिम फेरी व पदक निश्चित केले. महिला दुहेरीत मात्र भारताचे आव्हान संपले. मिश्र दुहेरीत मात्र ध्रुव व मेघना जोडीने नेपाळच्या बिकाश श्रेस्ता व अनुमया राय जोडीचा 21-14, 21-13 असा पराभव करत अंतिम फेरी गाठली.
मैदानी स्पर्धेत आगेकूच भारताची मैदानी स्पर्धेतील आगेकूच चौथ्या दिवशीही कायम राहिली. भारतीय खेळाडूंनी एक सुवर्ण, चार रजत तर 2 ब्रॉंझ अशी एकूण 7 पदके पटकावताना स्पर्धेवर वर्चस्व गाजविले. कार्तिक उन्नीक्रीने सुवर्ण, तर महंमद सलाहुने तिहेरी उडीत रजतपदकाची कमाई केली. महिला गटात भैरबी रॉयने 400 मीटर शर्यतीत ब्रॉंझ, प्रिया हबाथेनने रजतपदक, तर जिवान प्रियंथने ब्रॉंझपदक पटकावले. अडथळ्याच्या शर्यतीत सुरींदर जायक आणि अपर्णा रॉयने रजतपदक प्राप्त केले. टेबल टेनिसमध्ये भारताने मिश्र दुहेरीत सुवर्णपदक जिंकले. पुरुष व महिला दुहेरीतही भारताने सुवर्णपदक जिंकले.
वुशु स्पर्धेत भारताने श्रीलंकेचा पराभव करताना सुवर्णपदक मिळविले, तर फुटबॉलमध्ये भारतीय महिलांनी श्रीलंकेचा 6-0 असा पराभव करताना सुवर्णपदक प्राप्त केले.