मुंबई (प्रतिनिधी) – राज्यात मिशन इंद्रधनुष विशेष मोहिमेचा दुसरा टप्पा सुरु झाला असून 25 जिल्हे आणि 20 महापालिका क्षेत्रातील 78 हजार 64 बालके आणि 11 हजार 977 गर्भवती महिलांना लसीकरण करण्यात येणार आहे. मुंबईसह नवी मुंबई ठाणे व आसपासच्या महानगर पालिकांमध्ये ही मोहिम राबवण्यात येणार आहे.
लसीकरण मोहिमेचा आढावा घेण्यासाठी सुकाणू समितीची बैठक मुख्य सचिव अजोय मेहता यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यावेळी ते बोलत होते. मुख्य सचिवांनी व्हीडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून जिल्हाधिकारी यांच्याशी संवाद साधला.
नगर, औरंगाबाद, अमरावती, बीड, बुलढाणा,चंद्रपूर, गोंदीया, हिंगोली, जळगाव, जालना, लातूर, नंदुरबार, धाराशीव, परभणी, पालघर-वसई- विरार, रायगड-पनवेल, रत्नागिरी, सातारा, सोलापूर, सिंधुदूर्ग, वर्धा, वाशिम, नाशिक-मालेगाव, ठाणे-कल्याण डोंबिवली, मिरा भाईंदर, भिवंडी, नवी मुंबई, उल्हासनगर, बृहन्मुंबई या जिल्हा आणि महापालिका क्षेत्रांमध्ये ही मोहिम राबविण्यात येत असून 0 ते 2 वर्षे वयोगटातील बालके आणि गर्भवती महिलांचे लसीकरण केले जाणार आहे. डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी आणि मार्च या चार महिन्यांमध्ये आठवडाभर ही मोहिम राबविण्यात येणार आहे.