शशिकांत भालेकर
पारनेर तालुक्यातील आ. नीलेश लंके, माजी आ. विजय औटी समर्थकांसह महाविकास आघाडीद्वारे सत्तेत
पारनेर – राज्यात शिवसेना, राष्ट्रवादी, कॉंग्रेस, अशा तीन पक्षांचे मिळून महाआघाडी सरकार सत्तेत आले आहे. मात्र तालुक्याच्या राजकारणावर त्याचा काय परिणाम होतो, तालुक्यात एकमेकांच्या विरोधात लढले आ. नीलेश लंके व माजी आ. विजय औटी हे महाविकास आघाडीच्या माध्यमातून एकत्र येतात का, याबाबत सध्या चर्चा सुरू आहे.
राज्यात तीन पक्षांची महाविकास आघाडी सत्तेत आली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून या सरकारबाबत अनिश्चितता निर्माण झाली होती. मात्र उद्धव ठाकरे यांच्या शपथविधीनंतर त्यावर शिक्कामोर्तबत झाले. असे असताना ग्रामीण भागात देखील राजकारण बदलणार का, अशा चर्चांना उधाण आले आहे.
पारनेर तालुक्यामध्ये विधानसभा निवडणुकीमध्ये शिवसेना व राष्ट्रवादी या दोन पक्षांमध्ये लढत झाली होती. या लढतीत शिवसेनेचे विजय औटी यांचा पराभव करत राष्ट्रवादीचे नीलेश लंके विजयी झाले होते. एक महिन्यापूर्वीच झालेल्या निवडणुकीमध्ये या दोन्ही नेत्यांचे कार्यकर्ते एकमेकांसमोर भिडले होते. असे असताना या दोन्ही पक्षांची सत्ता सध्या राज्यात आली आहे.
त्याचा परिणाम तालुक्यातील राजकारणावर देखील होण्याची शक्यता असून, तालुक्यातील हे एकमेकांच्या विरोधात लढलेले मातब्बर सत्तेच्या माध्यमातून एकत्र येतात का की आपले राजकीय अस्तित्व पुढील काळामध्ये टिकून ठेवण्यासाठी वेगळ्या चुली मांडतात, याकडे लक्ष लागले आहे. आगामी वर्षभरात तालुक्यातील 88 ग्रामपंचायती, पारनेर नगरपंचायत, पंचायत समिती सभापती, उपसभापती निवड होत आहे. या निवडणुकीत महाआघाडीतील तीन पक्षांतील नेते एकत्र येऊन लढतात का स्थानिक पातळीवर आपापल्या पद्धतीने राजकारण करतात, हे येत्या काळात स्पष्ट होईल.
राजकारण हे नेहमी सत्तेच्या भोवती फिरत असते. त्यामुळे तालुक्यात तिन्ही पक्ष सत्तेत आल्यामुळे वेगळा अनुभव मतदारांना पहावयास मिळू शकतो. कारण तिन्ही पक्षांचे नेते, पुढारी, कार्यकर्ते हे सध्या सत्तेत आहेत व त्या सत्तेच्या माध्यमातून आपापल्या कार्यकर्त्यांना फायदा कसा मिळू शकतो, याबाबतची गणिते आखली जाऊ शकतात. प्रमुख पक्ष भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी, कॉंग्रेस हे सध्या सत्तेत आहेत. त्यापैकी भाजप केंद्रात, तर इतर पक्ष राज्यात सत्तेत असल्याने या पक्षांचे सर्वच नेते, पुढारी, कार्यकर्ते सध्या या ना त्या कारणाने सत्तेच्या समीकरणात आहेत. त्याचा फायदा तालुक्याच्या विकासासाठी कसा केला जातो, याकडे तालुक्यातील जनतेचे लक्ष लागले आहे.
राष्ट्रवादीकडे आमदार लंके, प्रशांत गायकवाड, उदय शेळके, दीपक पवार, बाबाजी तरटे, अशोक सावंत, शिवसेनेत विजय औटी, रामदास भोसले, गणेश शेळके, काशिनाथ दाते, अशोक कटारिया, भाजपकडे तालुकाध्यक्ष विश्वनाथ कोरडे, वसंत चेडे, राष्ट्रवादीतून भाजपमध्ये दाखल झालेले जि.प.चे उपाध्यक्ष सुजित झावरे, गंगाराम बेलकर, विखेंच्या सोबत असणारे राहुल झावरे, राहुल शिंदे, पुष्पा वराळ, भास्कर शिरोळे या सर्व पक्षांतील नेते, पुढारी कार्यकर्त्यांचा पक्ष सध्या केंद्रात किंवा राज्यात सत्तेत आहे. या माध्यमातून तालुक्यात त्याचा विकासासाठी काय फायदा होतो व याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
औटींची मंत्रिपदाची हुकलेली संधी लंकेंना मिळणार?
विधानसभेचे उपाध्यक्ष राहिलेले विजय औटी तालुक्यातून निवडून आले असते, तर त्यांना शिवसेनेकडून मंत्रिमंडळामध्ये निश्चित स्थान मिळू शकले असते. पण विजय औटी यांची ती संधी हुकली! मात्र त्यांना विधान परिषदेवर घेऊन मंत्री केल जाईल, अशी त्यांच्या समर्थकांना अशा आहेत. परंतु सध्यातरी ती धुसूर आहे. राष्ट्रवादीकडून आ. नीलेश लंके यांच्या साधेपणा व संघटन कौशल्या या जमेच्या बाजूमुळे व जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादीला वाढवण्यासाठी आ. लंके यांना राज्यमंत्रिपदाची संधी मिळू शकते, अशी शक्यता आहे.