मुंबई : राज्यातील सत्तास्थापनेचा पेच आता सुटणार असल्याचे जवळपास निश्चित झाले आहे. कारण, कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांची नवी दिल्लीमधील बैठक संपली आहे. यानंतर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी माध्यमांशी बोलताना सरकार संपूर्ण पाच वर्षे टिकावे यासाठीच एवढी चर्चा सुरू आहे. जे ठरेल ते पूर्ण विश्वासाने आणि भक्कम पायावर उभे राहिले, तर सरकार पाच काय पंधरा वर्षे देखील टिकेल, असे म्हटले आहे.
जयंत पाटील म्हणाले, सरकारस्थापनेबाबत चर्चा बरीच पुढं गेलेली आहे. आमच्या मित्र पक्षांना उद्या आम्ही मुंबईत बोलावत आहोत. त्यांच्याशी उद्या 12 वाजता आम्ही भेटणार आहोत. त्यानंतरच पुढची आवश्यक पावले तातडीने पडतील, असे मला वाटते. मित्र पक्षांना विश्वासात घेतल्यानंतरच आम्ही ज्यांच्याबरोबर सरकार स्थापनेसाठी चर्चा करतो आहोत, त्यांच्याबरोबर पुढे जाणार आहोत.
सरकार पाच वर्षे टिकावं यासाठीच एवढी चर्चा सुरू आहे. जे ठरेल ते पूर्ण विश्वासाने आणि भक्कम पायावर उभे राहिले, तर सरकार पाच काय पंधरा वर्षे देखील टिकेल. कॉंग्रेस-राष्ट्रवादीला सरकार चालवण्याचा प्रदीर्घ अनुभव आहे व शिवसेना हा नवा पक्ष आमच्याबरोबर जोडला जातो आहे. त्यामुळे समन्वयाची आवश्यकता आहे, असे जयंत पाटील यांनी सांगितले.