घोडेगाव तहसीलदारांना शिवसेनेकडून निवेदन
मंचर – शेतकऱ्यांना पीकनुकसान भरपाईपोटी राज्यपालांनी दिलेली आर्थिक मदत अत्यंत नगण्य आहे. पीकनुकसान भरपाई रकमेत वाढ करावी, अशी मागणी आंबेगाव तालुका शिवसेनेच्या वतीने घोडेगाव येथील नायब तहसिलदार यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे.
पुणे जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष अरूण गिरे, युवासेनेचे महाराष्ट्र राज्य विस्तारक सचिन बांगर, युवासेना उपतालुका युवा अधिकारी राहुल पोखरकर, अक्षय विधाटे यांनी घोडेगाव येथे जाऊन महसूल व कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांना समक्ष भेटीदरम्यान निवेदन देण्यात आले. या निवेदनात म्हटले आहे की, आंबेगाव तालुक्यात परतीच्या पावसामुळे 32 हजार 774 शेतकऱ्यांचे 15 हजार 823.40 हेक्टर पिकाचे क्षेत्र बाधीत झाले आहे. ओल्या दुष्काळामुळे शेतकऱ्यांचे हाता तोंडाशी आलेले पिक उद्ध्वस्त झाल्याने बळीराजा आर्थिक संकटात सापडला आहे.
दुबार पेरणी आणि लागवड करावी लागणार असल्याने भांडवली खर्च भागवणे अशक्य असून शेतकऱ्यांवर मोठे अस्मानी संकट कोसळले आहे. यासंदर्भात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे, शिवसेना उपनेते शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेनेच्या वतीने ओल्या दुष्काळाच्या प्रादुर्भावामुळे बाधित शेतकऱ्यांना जाहीर करण्यात आलेली मदत नगण्य असून मदत वाढून मिळावी.