पिण्यासच नव्हे तर वापरण्यासही हानिकारक
पळसदेव – उजनी जलाशयातील पाण्यावर गडद हिरव्या रंगाचा तवंग आल्याने हे पाणी पिण्यासच नव्हे तर वापरण्यासही अशक्य झाले आहे. उजनीतील पाण्याची अतिशय दुर्गंधी सुटली असून हे पाणी हिरवे विष असल्याचे भासत आहे. यातून नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले असताना प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून याकडे कोणतेही लक्ष नसल्याचे उघड होत आहे.
पुणे, सोलापूर आणि नगर या तीन जिल्ह्यासह लातुर, उस्मानाबाद जिल्ह्यांना देखील उजनीचे पाणी वरदान ठरत असल्याचे म्हंटले जाते. या भागातील सर्वसामान्य नागरिकांसाठी वरदान असलेले उजनी धरण मात्र दूषित पाण्यामुळे सध्या शाप ठरू लागले आहे.
धरणातील पाण्याच्या आधारावर गेल्या काही दशकांपासून राजकारण करणाऱ्या राजकारण्यांनी विकासाच्या नावाखाली धरणातील पाण्याच्या आधारावर रासायनिक कंपन्या नजीकच्या परिसरामध्ये आणून उभ्या केल्या, त्यातून निघणारे रसायनयुक्त पाण्यावर प्रक्रिया करून शुद्ध करण्यासाठी कोट्यवधींचा खर्च येत असल्याने संबंधीत कंपन्या शासकीय यंत्रणेला हाताशी धरून पाण्याचे शुद्धीकरण करण्याऐवजी ते पाणी साठवून ठेवून पावसाच्या दिवसात नजीकच्या ओढ्या, नाल्यात सोडून देत आहेत.
पावसाळ्यात हेच दूषित पाणी 15 ते 20 वर्षापासून उजनी धरणात येऊ लागल्याने या पाण्याचे दुष्परिणाम हळूहळू दिसू लागले आहेत. आजघडीला उजनीतील पाणी प्रदूषित झाल्याचे उघडपणे दिसू लागले आहे. उजनीचे पाणी गडद हिरव्या रंगाच्या ऑइल पेंट प्रमाणे दिसत असून किनाऱ्यापासून मध्य भागापर्यंत हा हिरवट रंगाचा तवंग पसरला आहे. या विषारी प्रदूषित पाण्यामुळे उजनी धरणातील अनेक मासळीच्या जाती नष्ट झाल्या आहेत. शिवाय धरणात येणाऱ्या अनेक पान वनस्पतीही नष्ट झाल्या आहेत.
या प्रदूषित पाण्यामुळे शेतीचा कस बिघडत चालला असून गंभीर आजार जडत आहेत. मात्र, पुणे, पिंपरी चिंचवड, कुरकुंभ औद्योगिक वसाहतीतील, उजनी धरण परिसरातील साखर कारखान्यांतून मळीमिश्रीत व रसायनयुक्त पाणी धरणात सोडले जात आहे. या कंपन्यांवर कारवाई गरजेची आहे. मात्र, प्रदूषण नियंत्रण मंडळ व प्रशासन बोटचेपे धोरण राबविण्यात असल्याचे दिसत आहे. उजनीच्या पाण्यावर अवलंबून असणाऱ्या लाखो नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.
लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष –
पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिकांनी उजनी प्रकल्प बाधित गावात पाण्याचे फिल्टर बसवण्यासाठी निधी दिला होता. मात्र, निधी दिला म्हणजे परत पाणी प्रदूषित करण्याचे लायसन मिळाल्यासारखे या भागातील उद्योजक वागत आहेत. नागरिकांच्या जीवाशी हा खेळ सुरू आहे. दूषित पाणी नदीत सोडून उजनीचे पाणी प्रदूषित केले जात असल्याने या भागातील प्रतिनिधीही हाताची घडी आणि तोंडावर बोट ठेवून आहेत.