भारत-बांगलादेश कसोटी मालिका ः पाच झेल सुटूनही बांगलादेशचा डाव कोसळला
इंदूर: त्ररक्षकांनी तब्बल पाच झेल सोडले तरीही बांगलादेशच्या फलंदाजांनी भारतीय गोलंदाजाच्या भेदक माऱ्यापुढे नांगी टाकली. त्यांचा पहिला डाव चहापानानंतर लगेचच केवळ 150 धावांत कोसळला. पहिल्या दिवसाचा खेळ थांबला तेव्हा भारतीय संघाने रोहित शर्माचा बळी गमावून 1 बाद 86 धावा केल्या. भारतीय संघ अद्याप 64 धावांनी पिछाडीवर असून मयांक अग्रवाल 37 तर चेतेश्वर पुजारा 43 धावांवर खेळत आहेत.
बांगलादेशला दीडशतकी धावसंख्येत रोखल्यानंतर भारताने उर्वरित 26 षटकांच्या खेळात रोहित शर्माचा बळी गमावून 1 बाद 86 धावा केल्या. अबु जायेदच्या चेंडूवर रोहितचा झेल लिंटन दासने घेतला त्यावेळी भारताच्या केवळ 14 धावा फलकावर लागल्या होत्या. त्यानंतर मात्र दुसरा सलामीवीर मयांक अग्रवालने पुजाराच्या साथीत संघाचे आणखी नुकसान होऊ दिले नाही. आज पुजाराचा खेळ नेहमीसारखा संथ नव्हता तर त्याने बांगलादेशच्या गोलंदाजीवर आक्रमण केले. त्याने 7 चौकार फटकावताना केवळ 61 चेंडूत नाबाद 43 धावा केल्या. अग्रवालने 81 चेंडूत 6 चौकारांच्या मदतीने नाबाद 37 धावा केल्या. या जोडीने 72 धावांची भागीदारी करत संघाचा डाव सावरला. बांगलादेशलाही सुमार क्षेत्ररक्षणाचा फटका बसला. अग्रवालचा सोडलेला झेल त्यांनाही महागात पडण्याची शक्यता आहे.
अश्विनचा विक्रम
भारतीय क्रिकेट संघातील ऑफस्पीनर रवीचंद्रन अश्विन याने बांगलादेशविरुद्धच्या आजपासून सुरू झालेल्या पहिल्या कसोटी सामन्यात 250 बळींचा पल्ला गाठला. बांगलादेशचा कर्णधार मोमेनुल हक याला बाद करत अश्विनने घरच्या मैदानावर 250 कसोटी बळी घेत अनिल कुंबळे व हरभजनसिंग यांच्या पंक्तीत स्थान मिळविले. त्याचबरोबर 42 वा कसोटी सामना खेळताना 250 बळी घेण्याच्या श्रीलंकेच्या मुथय्या मुरलीधरनच्या कामगिरीशी त्याने बरोबरी केली.
तत्पूर्वी, नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा बांगलादेशचा निर्णय भारतीय गोलंदाजांनी चुकीचा ठरविला. महंमद शमी, उमेश यादव, ईशांत शर्मा व रवीचंद्रन अश्विन यांनी भेदक गोलंदाजी करत बांगलादेशचा डाव 58.3 षटकांत 150 धावांवर गुंडाळला. त्यांच्या डावाची सुरुवातच खराब झाली. सलामीवीर प्रत्येकी केवळ 6 धावा काढून बाद झाले. त्यानंतर कर्णधार मोमीनूल हक आणि मुशफिकूर रहीम यांनी डाव सावरण्यासाठी सावध खेळ केला, मात्र हक 37 धावांवर तर, मुशफिकूर 43 धावांवर बाद झाले आणि त्यानंतर मात्र त्यांच्या एकाही फलंदाजाला भारतीय गोलंदाजांचा सामना करण्यात यश आले नाही. त्यांचे फलंदाज ठराविक अंतराने बाद झाले.
त्यांच्या संघातील 6 फलंदाजांना तर दोन आकडी धावादेखील करता आल्या नाहीत. भारताकडून महंमद शमीने 3, तर ईशांत शर्मा, उमेश यादव व रवीचंद्रन अश्विन यांनी प्रत्येकी दोन गडी बाद केले. तैजुल इस्लाम रवींद्र जडेजाच्या अफलातून क्षेत्ररक्षणामुळे धावबाद झाला. जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेत आजतागायत भारतीय संघाने सलग विजयांची मालिका कायम राखली असून याही सामन्यात संघ यशस्वी होईल असे वर्चस्व संघाने पहिल्याच दिवशी प्रस्थापित केले आहे.
यापूर्वी भारतीय संघाने दोन मालिका खेळल्या, त्यात संघाने वेस्ट इंडिजला 2-0, तर दक्षिण आफ्रिकेला 3-0 ने पराभूत केले आहे. भारतीय संघाने कोहलीच्या नेतृत्वाखाली यंदाच्या मोसमात अव्वल दर्जाचा खेळ केला आहे. वेस्ट इंडिज तसेच त्यानंतर मायदेशात दक्षिण आफ्रिकेविरुद्ध झालेल्या कसोटी मालिकांमध्ये वर्चस्व राखत या मालिका जिंकल्या आहेत. क्रिकेटच्या तिनही प्रकारात भारतीय संघाची यंदाची वाटचाल जागतिक स्तरावर दबदबा निर्माण करणारी ठरत आहे. फलंदाजी आणि गोलंदाजीत प्रत्येक खेळाडू संघाच्या विजयात आपले योगदान देत आहे.